कोल्हापूर : अंबाबाई मंदिरातील खराब किंवा तुटलेल्या मूर्तीचा भाग, जुन्या बांधकामाला पडलेले तडे, तसेच अन्य महत्त्वाच्या वास्तूंचे संवर्धन करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. पुरातत्त्व विभागाच्या प्रमुख तज्ज्ञांमार्फत मंदिरांतर्गत प्रत्येक भाग, मूर्ती आणि तुटलेल्या वस्तूंची तपासणी करण्यात येत आहे. याचे डिटेलिंग पूर्ण करून त्याबाबतचा अहवाल पुरातत्त्व विभागाकडे देण्यात येणार आहे.
शासनाच्या उच्चाधिकार समितीमार्फत नुकतीच अंबाबाई मंदिरात संवर्धन कामासाठी १४३ कोटी निधीला मंजुरी देण्यात आली. या निधीतून मूळ हेमाडपंती मंदिर, ६४ योगिनी, तसेच दुरुस्ती होणे आवश्यक असलेल्या प्रत्येक वास्तू, मूर्तीची संवर्धन प्रक्रिया राबवली जाणार आहे. तीर्थक्षेत्र आराखड्याची प्रक्रिया कधीही होऊन मंदिरांतर्गत कामाला आवश्यक निधी मिळाल्याने या कामाला गती येणार आहे. त्यामुळे देवस्थान समिती आणि पुरातत्त्व विभागाकडून तातडीने मंदिरातील सर्व भागाचे डिटेलिंगचे काम हाती घेण्यात आले आहे.
या डिटेलिंगमध्ये मंदिरात संवर्धन करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक भागाची, मूर्तीची पूर्ण तपासणी करून त्याची नोंद घेतली जात आहे. मूर्ती किंवा वस्तूचा कोणता भाग तुटला आहे, साधारण तो कशामुळे तुटला आहे, त्याचे संवर्धन कशा प्रकारे होऊ शकते, याबाबतच्या टिप्पणी या तपासणी अहवालात करण्यात येत आहे.
पुरातत्त्व विभागाने नुकतेच पंढरपूरचे विठ्ठल मंदिर मूळ स्वरूपात आणण्याचे काम यशस्वीपणे पूर्ण केले. त्यामुळे मंदिरातील सर्व मूर्ती, जुन्या महत्त्वाच्या वास्तूंचे संवर्धन झाले. अंबाबाई मंदिराच्या प्रत्येक भागाचे याचप्रकारे संवर्धन केले जाणार आहे.
-विलास वहाणे,
सहाय्यक संचालक, पुरातत्त्व विभाग
अंबाबाई मंदिरात बाराही महिने भक्तांची गर्दी असते. त्यामुळे डिटेलिंगचे काम जमेल त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे नाजूक काम असल्यामुळे गर्दी नसताना, अगदी गरज पडल्यास रात्रीच्या वेळीही काम हाती घेतले जात आहे.
-शिवराज नाईकवाडे, सचिव, देवस्थान समिती


