पाबळ (शिरूर): विधानसभा निवडणुकीपूर्वी हजारो शिरुर-हवेलीकरांना उज्जैन (मध्य प्रदेश) येथे महाकालदर्शन घडवून स्वत: विधानसभा दर्शन प्राप्त केलेल्या आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या धर्तीवर वढु बुद्रुक (ता.शिरूर) येथील माजी सरपंच तथा उद्योगपती प्रफुल्ल शिवले हे आज (ता.०८) पाबळ-केंदूर परिसरातील भाविकांना उज्जैन महाकाल दर्शनसाठी घेवून निघाले आहेत. यापूर्वी कोरेगाव भिमा परिसरातील २५०० भाविकांना दर्शन घडवले आहे. दुसऱ्या ट्रिपसाठी त्यांनी पाबळ-केंदूर भागातील भाविकांना निवडले आहे.
साधारण ७०० किलोमिटरचा संपूर्ण रेल्वे प्रवास असलेली ही दूसरी भाविक फेरी दुपारी २ वाजता हडपसर (पुणे) रेल्वे स्टेशनवरुन प्रस्थान करणार असून उद्या (ता.०९) मंगळवारी सकाळी ९ वाजता उज्जैन येथे पोहचणार आहे. येथील पवित्र ’कोटितीर्थ’ वर महास्नान करताच थेट महाकाल दर्शनासाठी सर्व भाविक प्रस्थान करतील. महाकाल मंदिरात दर्शन, महाआरती, महाअभिषेक, महाकाल भजन आदी कार्यक्रमानंतर सर्वांसाठी महाप्रसाद आणि संपूर्ण उज्जैन नगरी दर्शन केले जाणार आहे. रात्री सर्वांसाठी महाभक्ती संगीताचा रंगतदार कार्यक्रमही येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती सतीश फडतरे आणि कांतिलाल फडतरे यांनी दिली. दरम्यान दिवसभराची उज्जैन यात्रा पूर्ण होताच मंगळवारी (ता.०९) रात्री नऊच्या सुमारास परतीचा प्रवास सुरु होणार आहे. बुधवारी (ता.१०) रोजी दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास सर्व भाविक पुन्हा हडपसर (पुणे) येथे उतरणार असल्याची माहिती माजी सरपंच अंकुश शिवले, माऊलीआप्पा भंडारे यांनी दिली.
शिरुरकरांचा दूसरा ’श्रावणबाळ’
४५ दिवसांमध्ये पावणारा देव म्हणून बारा ज्योतिर्लिंगापैंकी एक असलेल्या उज्जैन महाकाल यांना मानले जाते. ही यात्रा घडविणारा आणि ही यात्रा करणारे यांच्यासाठी हे दैवत पुढील ४५ दिवसांत एक विशेष साक्षात्कार करणारे, रखडलेली कामे मार्गी लावणारे म्हणून देशात प्रसिध्द आहे. ही यात्रा घडविणाऱ्याला महाराष्ट्रात श्रावणबाळ संबोधले जाते. श्रावणबाळाने ज्या पध्दतीने आपल्या आई-वडीलांचे तिर्थाटन केले होते, त्याच धर्तीवर या दुसऱ्या ट्रिपला तब्बल २५०० भाविक उज्जैनला नेणारे उद्योगपती प्रफुल्लशेठ शिवले हे शिरुर-हवेलीकरांसाठी दूसरे श्रावणबाळ ठरणार आहेत. कारण विधानसभा निवडणुकीपूर्वी विद्यमान आमदार माऊली कटके यांनी शिरुर-हवेलीकरांना उज्जैन यात्रा घडविली होती. त्यामुळे ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके हे शिरुर-हवेलीचे पहिले श्रावणबाळ, तर प्रफुल्लशेठ शिवले हे शिरुरकरांचे आता दूसरे श्रावणबाळ ठरले आहेत.
धार्मिक महत्व :
उज्जैन हे देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक, हजारो वर्षांपासून हे पवित्रस्थान शिवभक्तांसाठी आदराचे. हे एकमेव दक्षिणमुखी महादेव मंदिर असल्याने हे स्थान अत्यंत पुण्यदायी आणि भक्तांसाठी मोक्षप्राप्त करुन देणारे असल्याचे सांगितले जाते. महाकवी कालिदासांनी आपल्या रचनांमध्ये उज्जैननगरी व महाकालेश्वरांचे वर्णन केले असून मंदिराबद्दलची नोंद महाकवी कालिदासांसह हिंदूधर्मियांच्या सर्व ऐतिहासिक दस्तऐवजांमध्ये आढळते. ४५ दिवसांमध्ये इच्छापुर्ती करणारे हे धार्मिक स्थान मानले जात असल्याने येथे जाणारा भाग्यवान समजला जातो.


