Suryakumar Yadav On Asia Cup Victory: सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पाकिस्तानला पराभूत करत आशिया कपची ट्रॉफी जिंकली. अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर 5 विकेट्सने विजय मिळवला. या स्पर्धेत भारताने पाकिस्तानविरुद्ध तीन सामने खेळले आणि प्रत्येकवेळी विजय मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली. मात्र, विजयानंतर ट्रॉफी स्वीकारण्यावरून मैदानावर अनोखे नाट्य रंगले.
ट्रॉफी स्वीकारण्यावरून वाद
दरम्यान, 28 सप्टेंबरच्या रात्री उशिरापर्यंत भारतीय संघाने ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला होता. पीसीबी प्रमुख व एसीसी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी घ्यायची नसल्याचे भारताने स्पष्ट केले होते. नक्वी मात्र आपल्याच भूमिकेवर ठाम राहिले. परिणामी, संघाने मैदानावर ट्रॉफीशिवायच जल्लोष साजरा केला.
सूर्यकुमार यादव काय म्हणाले?
या प्रकरणाबाबत विचारले असता सूर्यकुमार यादव म्हणाला, ‘माझ्यासाठी खरी ट्रॉफी म्हणजे लोकांची मने जिंकणे आहे. ट्रॉफीचे फोटो इकडे-तिकडे फिरत आहेत, पण संघाने केलेल्या मेहनतीत आणि चाहत्यांनी दाखवलेल्या प्रेमातच खरी ट्रॉफी आहे. विजयानंतर संघातील आनंदाबद्दल बोलताना सूर्या म्हणाला, जेव्हा तुम्ही एकही सामना न गमावता स्पर्धा जिंकता, तेव्हा तो अनुभव खास असतो. संपूर्ण देशासाठी ही अविस्मरणीय भावना आहे.
पंतप्रधान मोदींच्या पोस्टवर प्रतिक्रिया
भारताच्या विजयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करून अभिनंदन केले होते. यावर प्रतिक्रिया देताना सूर्या म्हणाला, देशाचे नेते स्वतः फ्रंटफूटवरून फलंदाजी करतात तेव्हा खूप छान वाटते. असे वाटले की त्यांनी स्ट्राईक घेतला आणि धावा काढल्या. खेळाडूंना यामुळे अधिक आत्मविश्वास मिळतो. भारताच्या या विजयानंतर चाहत्यांसाठी मैदानावरील जल्लोषच खरी ट्रॉफी ठरला आहे.


