मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेचा (शिंदे गट) पहिला दसरा मेळावा गुरुवारी (2 ऑक्टोबर) मुंबईतील नेस्को सेंटरमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. येत्या काही महिन्यांत होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूसंदर्भात खळबळजनक दावा करत उपस्थितांना धक्का दिला.
रामदास कदम यांचा धक्कादायक आरोप
रामदास कदम यांनी आपल्या आक्रमक भाषणात बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीवर का ठेवण्यात आला, याचा तपास व्हायला हवा, अशी मागणी केली. त्यांनी असा गंभीर आरोप केला की, बाळासाहेबांचा मृतदेह हातांचे ठसे घेण्यासाठी दोन दिवस तसाच ठेवला गेला होता. या दाव्याने मेळाव्यात खळबळ उडाली.
मेळाव्यानंतर मीडियाशी बोलताना कदम यांनी आपल्या आरोपांवर ठाम असल्याचे सांगितले. ते म्हणाले, “ही माहिती मला बाळासाहेबांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनीच दिली. मातोश्रीवरही याबाबत चर्चा होती.” पुढे त्यांनी उद्धव ठाकरेंना इशारा देताना म्हटले, “ये तो झाकी है, अभी बहोत कुछ बाकी है.” असं रामदास कदम यांनी म्हंटले आहे.
बाळासाहेबांच्या मृत्युपत्रावरही प्रश्नचिन्ह
कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे मृत्युपत्र कोणी तयार केले, ते कधी बनवले गेले आणि त्यावर कोणाची सही आहे, याची चौकशी व्हावी, अशी मागणीही केली. त्यांनी उद्धव ठाकरेंवर थेट हल्ला चढवत म्हटले, “शिवसेना आम्ही वाढवली, उद्धव ठाकरेंनी नाही. तुम्ही आमच्या मुळावर उठाल, तर आम्ही बोलणार. अजून बरंच काही आहे, आम्ही हळूहळू सर्व सांगणार.” असंही रॅम कदम यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरेंवर टीकेची झोड
रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप करताना म्हटले की, उद्धव यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी, गजानन कीर्तिकर, दिवाकर रावते आणि स्वतः कदम यांना संपवण्याचा प्रयत्न केला. तसेच, एकनाथ शिंदे यांच्यावरही हल्ला केला गेला. “आम्ही तुरुंगात गेलो, पण तुम्ही आम्हाला संपवत आहात,” असा थेट आरोप रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर केला.


