Maharashtra Weather : महाराष्ट्र मध्ये उष्णतेचा कडाका दिवसेंदिवस वाढत असून नागरिक हैराण झाले आहेत. राज्यातील बहुतांश भागात उष्णतेची लाट पसरली असून काही ठिकाणी उष्माघाताचा धोका निर्माण झाला आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) ने तब्बल 23 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
कोकण विभाग
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे आणि मुंबईमध्ये उष्ण व दमट हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रायगडमध्ये मात्र कोरड्या हवामानाची शक्यता आहे. या संपूर्ण पट्ट्यात उष्णतेचा यलो अलर्ट लागू आहे.
मध्य महाराष्ट्र
धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर आणि सातारा जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, नंदूरबार आणि सिंधुदुर्ग येथे कोरडे हवामान राहणार आहे. सातारा, सांगली आणि सोलापूरमध्ये काही ठिकाणी उष्णतेची लाट जाणवण्याची शक्यता आहे.
मराठवाडा
छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे. लातूर आणि धाराशिव येथे कोरडे हवामान राहणार आहे.
विदर्भ
अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, वर्धा आणि यवतमाळ येथे काही भागांत उष्णतेची लाट जाणवते आहे. नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि वाशिममध्ये सध्या कोणताही अलर्ट जारी करण्यात आलेला नाही.
एकूणच, राज्यात उष्णतेचा प्रभाव कायम राहणार असल्याने नागरिकांनी दुपारच्या वेळी बाहेर जाणे टाळावे, भरपूर पाणी पिणे आणि आवश्यक ती काळजी घेणे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


