Devendra Fadnavis : महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा मिळवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा राजकीय पुढाकार घेतला आहे. त्यांनी महाराष्ट्रातील सर्व खासदार आणि प्रमुख पक्षांच्या नेत्यांना पत्र पाठवून या विधेयकाला समर्थन देण्याचे आवाहन केले आहे.
या पत्राद्वारे उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ, शशिकांत शिंदे आणि सुनिल तटकरे यांसारख्या नेत्यांना महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. “हा ऐतिहासिक क्षण आहे, सर्वांनी एकमताने साथ द्यावी,” असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, नरेंद्र मोदी यांनीही हे विधेयक एकमताने मंजूर करण्याचे आवाहन केले आहे. 16 ते 18 एप्रिलदरम्यान संसदेत विशेष अधिवेशन बोलावण्यात आले असून, या अधिवेशनात महिलांसाठी 33% आरक्षण लागू करण्यासंदर्भातील सुधारित विधेयक मांडले जाणार आहे.
अर्जुन राम मेघवाल हे ‘नारी शक्ती वंदन कायदा’ संदर्भातील सुधारित विधेयक सादर करणार आहेत. या विधेयकानुसार लोकसभेतील जागांची संख्या 543 वरून वाढवून 850 करण्याची तरतूद आहे. त्यापैकी 815 जागा राज्यांसाठी तर 35 जागा केंद्रशासित प्रदेशांसाठी असतील.
मात्र, या निर्णयावर विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी विशेष अधिवेशन लवकर बोलावल्याने आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान, महिला आरक्षण विधेयकाच्या अंमलबजावणीबाबत आता संसदेत काय निर्णय होतो, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.


