Mumbai News : मागच्या काही दिवसांपासून घायवळ शस्त्रपरवाना प्रकरण राज्यात चांगलच चर्चेचा विषय ठरत आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम हे सचिन घायवळ याला शस्त्र परवाना मंजूर केल्यामुळे अडचणीत सापडले आहेत. विरोधकांनी यानंतर योगेश कदम यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. त्याशिवाय, त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली. त्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याप्रकरणी पोलिसांकडून सचिन घायवळला शस्त्रपरवानाच दिला गेला नसल्याचा खुलासा केला. त्यामुळे विरोधकांना त्यांच्याकडून करण्यात येणार्या आरोपांच उत्तर मिळालं आहे.
गृहराज्यमंत्री आणि शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांनी शुक्रवारी(ता.10)आता पुन्हा एकदा विरोधकांना ट्विटद्वारे जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ट्विटमध्ये ते म्हणतात,राजकारणात सर्वच गोष्टींचा ‘सामना’ करावा लागतोच.पण अशा राजकारणामुळे मी आजवर कधीच विचलित झालो नाही आणि पुढेही होणार नसल्याचंही कदम यांनी म्हटलं.
तसेच यावेळी मंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी मी माझं काम,माझी जबाबदारी आणि माझं कर्तव्य प्रामाणिकपणे निभावत आहे आणि पुढेही तसंच निभावत राहणार असल्याचंही ट्विटमध्ये नमूद केलं.शेवटी असंच म्हणावं वाटतं की,छोटी मोठी वादळं उठली म्हणून पर्वत हलतो असं नाही, असे सांगत इरादेही स्पष्ट केले आहेत.
2019 पासून माझी राजकीय कारकीर्द संपुष्टात आणण्याचा प्रयत्न काहीजण करत आले. तरीसुद्धा सच्च्या शिवसैनिकांच्या जोरावर मी निवडून आलो. सत्तेतला आमदार म्हणून जनतेच्या अपेक्षा माझ्याकडून वाढल्या, परंतु तेव्हादेखील ज्या विरोधकाला आम्ही पराभूत केलं, त्यालाच ताकद देण्याचं काम काहीजणांनी केलं. स्वतःच्या पक्षातील आमदाराला संपवण्याचा प्रयत्न काहीजण तेव्हापासूनच करत होते,असंही मंत्री योगेश कदम यांनी म्हटलं.
कदम म्हणतात, पुन्हा 2024 च्या निवडणुकीत माझ्या कुटुंबियांचा स्वतःच्या वैयक्तिक राजकीय फायद्यासाठी वापर करून घेण्याइतपत राजकारणाची पातळी घसरली गेली. मला पराभूत करण्यासाठी त्यांनी समाज,पैसा आणि जातीच्या आधारावर गलिच्छ राजकारण करण्याचे अनेक प्रकार केले. माझी वैयक्तिक बदनामी करण्याच्या हेतूने माझ्या खासगी आयुष्यातदेखील ढवळाढवळ करण्याचा काहीजणांनी प्रयत्न केला.
तरीदेखील, दुसऱ्यांदा जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून मला निवडून दिले.माझ्या वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर विश्वास दाखवत मला मंत्रीपद दिले. साहजिकच,ज्यांना मला आमदार म्हणून पाहण्याचीही इच्छा नव्हती, त्यांना मी मंत्री झालो हे कसं बघवणार असा टोलाही विरोधकांना लगावला.
गेल्या सहा वर्षांपासून लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना आजवर माझ्यावर कोणीही गुंड किंवा भ्रष्ट प्रवृत्तीचे समर्थन केल्याचे आरोप देखील करू शकले नाहीत. तरीसुद्धा काही ठराविक मंडळी माझी इमेज डॅमेज होण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहेत,असा आरोपही कदम यांनी केला.


