Shyam Manav : श्याम मानव यांनी नाशिकमधील अशोक खरात प्रकरणावरून गंभीर आणि धक्कादायक आरोप केले आहेत. खरातचा संबंध एकनाथ शिंदे आणि रुपाली चाकणकर यांच्याशी जोडला गेल्यामुळेच या प्रकरणाचा सखोल तपास सुरू झाला, असा दावा त्यांनी केला आहे. (Shyam Manav)
श्याम मानव यांच्या मते, जर अशोक खरातसारख्या भोंदू बाबाचा संबंध प्रभावशाली राजकीय नेत्यांशी आला नसता, तर हे प्रकरण कदाचित सुरुवातीलाच दडपले गेले असते. उलट, आता या प्रकरणाचा वापर राजकीय पातळीवर ‘धडा शिकवण्यासाठी’ केला जात असल्याचाही आरोप त्यांनी केला.
त्यांनी पुढे सांगितले की, खरात हा लोकांची आर्थिक माहिती मिळवून बनावट आयकर अधिकाऱ्यांच्या माध्यमातून धाडी टाकत असे आणि त्यातून पैसे उकळत असे. या प्रकरणात अनेक अधिकारी आणि प्रभावशाली व्यक्ती त्याचे अनुयायी असल्याचाही दावा त्यांनी केला. (Shyam Manav)
महिलांशी संबंधित मुद्द्यावरही त्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. “भोंदू बाबा महिलांना फसवण्यासाठी भीतीचा वापर करत नाहीत, तर ‘गुरू’ म्हणून स्वतःला घोषित करून विश्वास संपादन करतात,” असे सांगत त्यांनी समाजातील अंधश्रद्धेवर कठोर टीका केली.
दरम्यान, या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून, खरात प्रकरणाचा तपास आणि त्यातील राजकीय कनेक्शन याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


