Zaheer Alam Passes Away: ९० च्या दशकात आपल्या लेखणीने संपूर्ण देशाला भुरळ घालणारे प्रसिद्ध गीतकार जहीर आलम यांचे ११ मे रोजी नागपूर येथे निधन झाले. अत्यंत साध्या परिस्थितीत राहणाऱ्या या प्रतिभावान कवीने जगाला ‘तुम तो ठहरे परदेसी’ सारखे ऐतिहासिक गीत दिले, जे आजही रसिकांच्या ओठांवर आहे.
एका गाण्याने रचला इतिहास
जहीर आलम यांनी लिहिलेले ‘तुम तो ठहरे परदेसी साथ क्या निभाओगे’ हे गीत सुरुवातीला केवळ कव्वाली म्हणून ओळखले जात होते. मात्र, गायक अल्ताफ राजा यांनी या गीताला आपला अनोखा साज चढवला आणि १९९० च्या दशकात या गाण्याने लोकप्रियतेचे सर्व उच्चांक प्रस्थापित केले. हे गाणे केवळ एक संगीत रचना न राहता, भारतीय संगीत क्षेत्रातील एक मैलाचा दगड ठरले.
यशाचे शिखर पण वाट्याला उपेक्षाच
जगाला वेड लावणाऱ्या या गीताचे गीतकार असूनही जहीर आलम यांचे वैयक्तिक आयुष्य मात्र संघर्षाने भरलेले होते. ज्या गाण्याने कोट्यवधींचा व्यवसाय केला, त्या गाण्यासाठी जहीर यांना केवळ 3,000 रुपये मानधन मिळाले होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. नागपूरच्या मोमिनपुरा भागातील एका छोट्या घरात ते वास्तव्यास होते. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात ते प्रसिद्धी आणि सुबत्तेपासून पूर्णपणे दूर राहिले.
कापड गिरणी ते कलाविश्व असा खडतर प्रवास
गीतकार म्हणून नावारूपास येण्यापूर्वी जहीर आलम यांनी एका कापड गिरणीत कामगार म्हणून काम केले होते. गिरणी सुरू असेपर्यंत त्यांचा प्रपंच सुरळीत चालला, मात्र ती बंद पडल्यानंतर त्यांच्यासमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला. प्रचंड प्रतिभा असूनही त्यांना साजेसा सन्मान आणि आर्थिक स्थैर्य लाभू शकले नाही, ही मोठी शोकांतिका मानली जात आहे. जहीर आलम यांच्या जाण्याने संगीतातील एक निगर्वी आणि संवेदनशील शब्दप्रभु हरपला असल्याची भावना व्यक्त होत आहे.


