BMC Election: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. सर्वच प्रमुख पक्षांनी प्रचार आणि उमेदवारांच्या तयारीस वेग दिला आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीच्या चर्चांमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली होती. मात्र, काँग्रेसने मनसेला महाविकास आघाडीत घेण्यास विरोध दर्शवल्यानंतर आता स्वतःचा मार्ग निवडला आहे. काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. ते म्हणाले, “मुंबई महानगरपालिका ही देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठी महानगरपालिका आहे. आमच्या मुंबई काँग्रेसच्या नेत्यांनी ठरवलं आहे की आम्ही ही निवडणूक स्वबळावर लढवणार आहोत. त्यामुळे जागा वाटप किंवा गठबंधन यावर प्रश्नच निर्माण होत नाही.”
मतांचं विभाजन होणार नाही
वडेट्टीवार पुढे म्हणाले, “मुंबईत काँग्रेस नेहमी लढत आली आहे आणि 30 ते 35 जागांवर आमचे प्रतिनिधी सातत्याने निवडून येत आहेत. महायुतीतले तीन पक्ष वेगवेगळे लढतात, त्यांचे मतांचे विभाजन होत नाही. मग आमच्या मतांचं विभाजन का होईल? आम्ही आमची ताकद दाखवण्यासाठी स्वतंत्र लढणार आहोत.”
जिंकणं उद्देश नाही, कार्यकर्त्यांना न्याय देणं महत्त्वाचं
वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं की, या निवडणुका कार्यकर्त्यांच्या संधीसाठी लढवल्या जाणार आहेत. “जिंकणं हा आमचा प्राथमिक उद्देश नाही. पण आमच्या कार्यकर्त्यांना न्याय आणि संधी देणं हा आमचा उद्देश आहे. समविचारी पक्षांचा प्रस्ताव आल्यास आम्ही त्यावर विचार करू, पण निर्णय स्थानिक पातळीवरच घेतला जाईल,” असं त्यांनी म्हटलं. मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीवरही वडेट्टीवारांनी भाष्य केलं. “जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले आणि त्यांनी आम्हाला प्रस्ताव दिला, तर तो प्रस्ताव मुंबई काँग्रेस विचारात घेईल. शरद पवार यांनीही प्रस्ताव दिला, तर त्यावरही चर्चा होईल,” असं त्यांनी सांगितलं. मात्र, काँग्रेसचा निर्णय स्पष्ट आहे. मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावरच लढवणार आहे.
नाशिकमध्ये वेगळी समीकरणं!
दुसरीकडे, नाशिकमध्ये मात्र वेगळं राजकीय चित्र दिसत आहे. महाविकास आघाडी आणि मनसेचे स्थानिक नेते एकत्र येण्याच्या हालचाली करत आहेत. नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत या नेत्यांनी भाजप सरकारवर भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी वाढवल्याचा आरोप करत, महायुतीचा पराभव करण्यासाठी आम्ही एकत्र लढणार आहोत, अशी घोषणा केली आहे. त्यामुळे मुंबईत काँग्रेस स्वबळाचा नारा देत असली तरी, नाशिकमध्ये मनसे आणि महाविकास आघाडीची युती निश्चित दिसत असल्याने आगामी निवडणुकीत नव्या राजकीय समीकरणांची सुरुवात होण्याची शक्यता आहे.


