Manikrao Kokate Slams BJP : महाराष्ट्रातील राजकीय फोडाफोडीला भाजपचा पूर्णपणे आधार असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे क्रीडा व युवक कल्याणमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शनिवारी (२९ नोव्हेंबर २०२५) केली. सिन्नर नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना त्यांनी भाजपला “पूर्णपणे बाटलेला पक्ष” संबोधून म्हणाले की, फोडाफोडीतच भाजपचे आयुष्य चालले असून, निष्ठावंत कार्यकर्ते मात्र घरी बसवले गेले आहेत.
विधानसभा निवडणुकीत कोकाटे यांच्या घरातील व्यक्ती फोडली गेली, तर आता खासदार राजाभाऊ वाजे यांच्या कुटुंबातील व्यक्ती भाजपकडे नेली गेल्याचा आरोप त्यांनी केला. सिन्नर येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवारांच्या प्रचारसभेत कोकाटे यांनी भाजपसह शिंदे सेनेला थेट लक्ष्य केले.
ते म्हणाले, “महाराष्ट्रात आपसांतच लढाया सुरू आहेत. युतीमध्ये सर्वाधिक संघर्ष आहे, तर विरोधी पक्षात तो काहीच दिसत नाही.” गेल्या दहा वर्षांपासून सिन्नर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी बदलण्याची मागणी करत असताना नगरविकास खात्याकडून काहीच झाले नाही, मात्र आता सिन्नरला “दत्तक घेण्याचा” प्रयत्न सुरू असल्याचा अप्रत्यक्ष आरोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांनी केला. “सरकारने धोरणात्मक निर्णय घ्यावा, दत्तक घेण्याच्या कोणीही घोषणा करू नये,” असे ते म्हणाले.
महिला सक्षमीकरणाच्या ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत बोलताना कोकाटे यांनी स्पष्ट केले की, हे श्रेय कुणालाच एकट्याने घेता येणार नाही; हा सामुदायिक निर्णय आहे. तसेच, येत्या २ डिसेंबरपर्यंत आम्ही आमचे पक्ष सांभाळू, तर ३ डिसेंबरला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मी पुन्हा एकत्र येऊ, अशी विनोदी सूचनाही त्यांनी केली.
मंत्रिपद बदलले तरी बोलण्याची शैली अजिबात बदलली नाही
माणिकराव कोकाटे यांनी आपल्या नेत्रदीपक शैलीत कृषी धोरणावरही भाष्य केले. “कृषी समृद्धी योजना मीच आणली, ज्यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फायदा झाला. मी कृषिमंत्री असतानाही तेच म्हणत होतो आणि आजही म्हणतोय: शेतकऱ्यांना कर्ज देऊ नका, अनुदानावर योजना द्या. शेतकऱ्यांचा १०० टक्के भांडवली खर्च सरकारने करावा, पण दहा ते पंधरा टक्के निधी लाभार्थीचा घ्यावा.
सर्वकाही फुकट दिले तर गोंधळ होतो.” मंत्रिपद बदलले तरी मी खरंच बोलतो, असे सांगून त्यांनी आपली पारदर्शक भूमिका अधोरेखित केली. कोकाटे यांच्या या वक्तव्याने सिन्नरमधील राजकीय वातावरण तापले असून, नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे.


