Election Commission Voter Ink: मुंबईत आज सकाळपासून मतदान पार पडत आहे. मतदारांच्या बोटावर लावण्यात आलेली शाई पुसण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती काही ठिकाणांवरून समोर आली. त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला. बोटावरची शाई पुसून एखादी व्यक्ती पुन्हा मतदान करण्यासाठी आल्याचे आढळल्यास त्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असे स्पष्टिकरण राज्य निवडणूक आयोगाने केले आहे.
नेमकं प्रकरण काय?
मुंबईत आज सकाळी मतदान करुन आलेल्या काही नागरिकांच्या बोटावरील शाई पुसली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली. मुंबईत अनेक ठिकाणी मतदारांच्या बोटावरील शाई पुसली जात आहे. यावरुन मनसेप्रमुख राज ठाकरे, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील सदर प्रकरणावरुन हल्लाबोल केला. राज्य निवडणूक आयोगाकडून यंदा मतदानासाठी शाईऐवजी मार्करचे किट उपलब्ध करुन देण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. हा मार्कर 2012 पासून प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वापरला जात असल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.
त्वचेवर तीन- चार वेळा घासून शाई लावावी
मतदाराच्या बोटाला शाई लावण्याकरिता मार्कर पेनच्या वापराबाबत राज्य निवडणूक आयोगाने 19 नोव्हेंबर 2011 रोजी आणि 28 नोव्हेंबर 2011 रोजी आदेश निर्गमित केले आहेत. तेव्हापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदाराच्या बोटाला शाई लावण्यासाठी मार्कर पेनचा वापर केला जात आहे. या आदेशानुसार मतदाराच्या बोटावर ठळकपणे उमटेल, अशा पद्धतीने मार्कर पेनने शाई लावण्यात यावी; तसेच नखावर आणि नखाच्या वरच्या बाजुला त्वचेवर तीन- चार वेळा घासून शाई लावावी, अशा सूचना यापूर्वीदेखील देण्यात आल्या असून आणि त्या मार्कर पेनवरही नमूद केल्या आहेत. त्यामुळे शाई पुसण्याचा प्रयत्न करण्याचे गैरकृत्य करू नये, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने केले आहे.
सतर्कता बाळगण्याच्या सूचना
बोटावरची शाई पुसून कोणी गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला, तरी संबंधित मतदाराला पुन्हा मतदान करता येत नाही, याबाबतची दक्षता यापूर्वीच घेण्यात आली आहे. मतदाराने मतदान केल्यानंतर त्याबाबत नोंद घेण्यात आलेली असते. त्यामुळे केवळ शाई पुसून गैरकृत्य केलेल्या मतदाराला पुन्हा मतदान करता येत नाही. याबाबत सतर्कता बाळगण्याच्या सूचना पुन्हा एकदा सर्व संबंधिताना देण्यात आल्या आहेत.


