Thane Shivshahi Fire: ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील गजबजलेल्या सॅटिस (SATIS) पुलावर गुरुवारी एका ‘शिवशाही’ बसला भीषण आग लागली. बसने अचानक पेट घेतल्याने प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसरली होती. मात्र, चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील १५ ते २० प्रवाशांना वेळीच बाहेर काढण्यात यश आले, ज्यामुळे एक मोठी जीवितहानी टळली आहे.
नेमकी घटना कशी घडली?
सदर शिवशाही बस ठाणे स्थानकावरून पालघर-बोईसरच्या दिशेने जाण्यासाठी निघाली होती. बस सॅटिस ब्रिजवर पोहोचताच इंजिनमधून धूर निघू लागला आणि काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले. बसने भीषण पेट घेतल्यामुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते. आगीची भीषणता एवढी होती की, पाहता पाहता संपूर्ण बस जळून खाक झाली.
बचावकार्य आणि संभाव्य कारण
आग लागल्याचे लक्षात येताच सर्व प्रवाशांना तातडीने खाली उतरवण्यात आले. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. घटनेची माहिती मिळताच ठाणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आणि अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. ही आग बसमधील इलेक्ट्रीक शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी, असा प्राथमिक अंदाज प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे ठाणे स्थानक परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते आणि वाहतुकीवरही याचा परिणाम झाला. शिवशाही बसला आग लागण्याच्या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे आता बसच्या तांत्रिक देखभालीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.


