Nira Railway Station Accident: पुणे-सातारा डेमू रेल्वेतून उतरताना पाय घसरून झालेल्या अपघातात एका तरुण प्रवाशाला आपले दोन्ही पाय गमवावे लागल्याची हृदयद्रावक घटना नीरा स्थानकावर घडली आहे. या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराबाबत प्रवाशांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
नेमकं काय घडलं?
सोमेश्वरनगर (बारामती) येथील आदित्य साहेबराव होळकर हा १८ वर्षीय तरुण सोमवारी संध्याकाळी रेल्वेने प्रवास करत होता. नीरा स्थानकात गाडी आली असता, उतरत असताना त्याचा तोल गेला आणि तो थेट धावत्या रेल्वेच्या चाकाखाली ओढला गेला. या भीषण अपघातात त्याचे दोन्ही पाय चिरडले गेले.
यंत्रणेचा निष्काळजीपणा उघड
दुर्घटनेनंतर मदत मिळवण्यासाठी प्रत्यक्षदर्शींनी आरडाओरडा केला, मात्र घटनास्थळी ना रेल्वे पोलीस (GRP) हजर होते, ना रेल्वे सुरक्षा दलाचे (RPF) जवान. विशेष म्हणजे, स्थानकावरील पोलीस मदत केंद्रालाही टाळे ठोकलेले असल्याने मदतीसाठी धाव घ्यायची कुठे, असा प्रश्न उपस्थित झाला. रेल्वे कर्मचाऱ्यांकडूनही तातडीने कोणतीही हालचाल न झाल्याने प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
स्थानिकांच्या तत्परतेमुळे वाचले प्राण
प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून स्थानिक तरुण आणि प्रवाशांनी मदतीसाठी धाव घेतली. प्रहार संघटनेच्या रुग्णवाहिकेतून आदित्यला तातडीने लोणंद व नंतर जेजुरी येथील रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या त्याची प्रकृती गंभीर असून, पुण्यातील संचेती रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
हेही वाचा – Pune MHADA Lottery : पुणे म्हाडा लॉटरीची प्रतीक्षा संपणार! 4186 घरांचा ‘लकी ड्रॉ’ लवकरच निघणार
प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे आवाहन
रेल्वे प्रवासादरम्यान असा कोणताही आपत्कालीन प्रसंग ओढवल्यास रेल्वे प्रशासनाने काही महत्त्वाच्या सुविधा दिल्या आहेत, ज्याची माहिती असणे आवश्यक आहे:
१३९ (139) हेल्पलाईन: कोणत्याही वैद्यकीय किंवा सुरक्षा मदतीसाठी २४ तास उपलब्ध असलेल्या १३९ या क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा.
‘रेल्वे मदत’ ॲप: या ॲपद्वारे तक्रार केल्यास तुमचे अचूक लोकेशन यंत्रणेला मिळते आणि तातडीने मदत पोहोचवली जाते.
स्थानिक यंत्रणा: स्थानकावर सुरक्षा रक्षक नसल्यास, १३९ वरून जवळच्या मोठ्या स्थानकावरील आरपीएफ पथकाला पाचारण करता येते.


