PMC Election: महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवारांऐवजी राजकीय पक्षांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना झुकते माप दिल्याने नवा वाद उफाळून आला आहे. खुद्द तुरुंगात असलेल्या आरोपींना आणि कुख्यात गुंडांच्या पत्नींना तिकीट दिल्याने सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला असून, राजकीय पक्षांच्या नैतिकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
पुण्यातील निवडणुकीत विविध पक्षांनी गुन्हेगारी टोळ्यांशी संबंधित व्यक्तींना संधी दिली आहे अजित पवार गटाने (राष्ट्रवादी) कुख्यात आंदेकर टोळीतील दोन महिलांना पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही महिला सध्या तुरुंगात आहेत. तसेच बापू नायर आणि गजा मारणे यांसारख्या गुन्हेगारी टोळ्यांशी संबंधित असलेल्यांच्या पत्नींनाही रिंगणात उतरवण्यात आले आहे. तर भाजपने अपहरण, खंडणी आणि गोळीबारासारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या देविदास चोर्घे यांच्या पत्नीला भाजपने उमेदवारी दिली आहे.
हेही वाचा – PMC Election: मोठी बातमी! मारणेनंतर आता अजित पवारांकडून आंदेकर टोळीच्या दोन महिलांना तिकीट
तुरुंगातून गटारं साफ करणार का? दमानियांचा तिखट सवाल
अंजली दमानिया यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकीय पक्षांच्या या निर्णयावर ताशेरे ओढले आहेत. त्यांनी विचारले की, नगरसेवकाचे मुख्य काम हे कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, शिक्षण आणि गटारांची सफाई यांसारख्या मूलभूत सुविधा पुरवणे हे असते. ज्या महिला स्वतः जेलमध्ये आहेत, त्या तिथून जनतेची कामे कशी काय करणार?
जनतेच्या हिताचा बळी?
दमानिया यांनी आपल्या पोस्टमध्ये राजकीय पक्षांना तुमची डोकी ठिकाणावर आहेत का? असा थेट सवाल केला आहे. ज्यांच्यावर खून, खंडणी आणि दहशतीचे आरोप आहेत, अशा लोकांकडून नागरिक विकासकामांची काय अपेक्षा ठेवणार? गुंड प्रवृत्तीच्या लोकांशी संबंधित व्यक्ती सत्तेत आल्यास शहरात कचरा उचलला जाईल की गुन्हेगारी वाढेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.


