पाबळ (पुणे): वढू बुद्रुकचे माजी सरपंच तथा उद्योगपती प्रफुल्ल शिवले यांनी पाबळ-केंदूर परिसरातील तीन हजार भाविकांना उज्जैन महाकाल यांचे दर्शन घडवून आणले. यापूर्वी कोरेगाव भिमा परिसरातील ३००० भाविकांना दर्शन घडविले असून, तिसऱ्या ट्रिपमध्ये पाबळ-केंदूर भागातील भाविकांचा समावेश होता.
१८ सप्टेंबर रोजी खडकी येथून सुमारे ३००० महिला आणि नागरिक मोठ्या भक्तिभावाने उज्जैनकडे रवाना झाले. हा संपूर्ण प्रवास भक्तिभाव, सेवाभाव आणि उत्साहाने परिपूर्ण होता. प्रवासादरम्यान जोरदार पावसाने थोडा अडथळा निर्माण केला. परंतु, प्रफुल्ल शिवले आणि सर्व स्वयंसेवकांनी स्वतः पावसात भिजत भाविकांची गैरसोय होऊ दिली नाही. झोपेसाठी आणलेल्या गाद्या भिजल्या तरी, कोणालाही त्रास होऊ नये म्हणून शिवले आणि सहकाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले.
जोरदार उज्जैन स्वागतम :
उज्जैनमध्ये आगमन होताच ढोल-ताशांच्या गजरात भाविकांचे शाही स्वागत करण्यात आले. फुलांचा वर्षाव करत सर्वांचे स्वागत झाले. नंतर भाविकांनी प्रसाद-जेवणाचा आस्वाद घेतला. देवदर्शनासाठी विशेष वाहनांची सोय करण्यात आली होती, ज्यामुळे सर्वांनी आरामात दर्शन घेतले. रात्री एक “भव्य संगीत भजन कार्यक्रम” झाला. ज्यामध्ये लहानग्यांपासून ते वडीलधाऱ्या भाविकांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि बेधुंद भक्तिरसात चिंब होवून आनंद लुटला.
संपूर्ण प्रवासात खाण्यापिण्याची कोणतीही कमतरता नव्हती. सर्व सोयी-सुविधांची योग्य प्रकारे व्यवस्था करण्यात आली होती. हा प्रवास एक अविस्मरणीय भक्तिपूर्ण अनुभव ठरला, ज्यामध्ये सेवाभाव, श्रद्धा आणि एकोप्याचे सुंदर दर्शन घडले. सर्व भाविक २० सप्टेंबर रोजी सुखरूप आपल्या घरी पोहचले.
View this post on Instagram
;
प्रत्येकाच्या हृदयातील ’श्रावणबाळ’
४५ दिवसांमध्ये पावणारा देव म्हणून बारा ज्योतिर्लिंगापैंकी एक असलेल्या उज्जैन महाकाल यांना मानले जाते. ही यात्रा घडविणारा आणि ही यात्रा करणारे यांच्यासाठी हे दैवत पुढील ४५ दिवसांत एक विशेष साक्षात्कार करणारे, रखडलेली कामे मार्गी लावणारे म्हणून देशात प्रसिध्द आहे. ही यात्रा घडविणाऱ्याला महाराष्ट्रात श्रावणबाळ संबोधले जाते. श्रावणबाळाने ज्या पध्दतीने आपल्या आई-वडीलांचे तिर्थाटन केले होते, त्याच धर्तीवर तिसऱ्या ट्रिपला तब्बल ३००० भाविक उज्जैनला नेणारे उद्योगपती प्रफुल्ल शिवले हे शिरुरकरांसाठी हृदयातील श्रावणबाळ ठरत आहेत.
जय महाकाल आणि साक्षात्कार
उज्जैन हे देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक, हजारो वर्षांपासून हे पवित्रस्थान शिवभक्तांसाठी आदराचे. हे एकमेव दक्षिणमुखी महादेव मंदिर असल्याने हे स्थान अत्यंत पुण्यदायी आणि भक्तांसाठी मोक्षप्राप्त करुन देणारे असल्याचे सांगितले जाते. महाकवी कालिदासांनी आपल्या रचनांमध्ये उज्जैननगरी व महाकालेश्वरांचे वर्णन केले असून मंदिराबद्दलची नोंद महाकवी कालिदासांसह हिंदूधर्मियांच्या सर्व ऐतिहासिक दस्तऐवजांमध्ये आढळते. ४५ दिवसांमध्ये इच्छापुर्ती करणारे हे धार्मिक स्थान मानले जात असल्याने येथे जाणारा भाग्यवान समजला जातो.


