पुणे : शहराला देशातील सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या शहरांमध्ये दुसरा क्रमांक मिळाला आहे. टॉम टॉम (TomTom) या आंतरराष्ट्रीय संस्थेने केलेल्या अभ्यासातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. वाढती वाहनसंख्या आणि अपुरी वाहतूक व्यवस्था यामुळे पुण्यातील वाहतूक समस्या अधिकच गंभीर बनत चालली आहे.
टॉम टॉम संस्थेच्या अहवालानुसार, पुण्यात वाहनचालकांना १० किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी सरासरी ३३ मिनिटे २० सेकंद वेळ लागत आहे. विशेष म्हणजे, गर्दीच्या वेळेत शहरातील वाहनांचा सरासरी वेग फक्त १५.१ किलोमीटर प्रतितास इतका असल्याचे या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.
या अहवालामुळे पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, ही समस्या सोडवणे हे आता शहरातील नवे कारभारी आणि प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरणार आहे. नागरिकांचा वेळ, इंधनाचा अपव्यय आणि प्रदूषण यावर या वाहतूक कोंडीचा थेट परिणाम होत आहे.
दरम्यान, देशपातळीवर सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या शहरांच्या यादीत पुण्याचा दुसरा क्रमांक लागल्याने शहराच्या वाहतूक नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.


