Sharad Pawar : मुंबईत आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचं कौतुक करत महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं. देशाच्या बाहेर भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम नरेंद्र मोदी करत असल्याचं सांगत, अशा मुद्द्यांवर राजकीय आरोप करू नयेत असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.
पुण्यातील लक्ष्मणराव गुट्टे रूरल डेव्हलपमेंट फाऊंडेशनतर्फे युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना शरद पवार म्हणाले, “नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांची आणि आमची वैचारिक भूमिका वेगळी असू शकते. मात्र देशाबाहेर भारताची प्रतिष्ठा वाढवण्याचं काम ते करत आहेत, ही बाब विसरून चालणार नाही. जिथे देशाची प्रतिष्ठा येते, तिथे राजकीय आरोप करायचे नसतात.”
या कार्यक्रमाला मंत्री उदय सामंत, प्रकाश आबिटकर, जयकुमार रावल, रणजितसिंह मोहिते-पाटील, खासदार संजय पाटील, धैर्यशील माने, नरेंद्र भोडेकर आणि अतुल भोसले यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
युवक काँग्रेसमधील प्रवासाची आठवण
राजकीय कारकिर्दीचा आढावा घेताना शरद पवार यांनी त्यांच्या युवक काँग्रेसमधील सुरुवातीच्या काळातील आठवणींनाही उजाळा दिला. “इंदिरा गांधींमुळे आम्हाला युवक वयात राजकारणात काम करण्याची प्रेरणा मिळाली. सुरुवातीला मी बारामती युवक काँग्रेसचा प्रमुख झालो आणि त्यानंतर महाराष्ट्र युवक काँग्रेसची जबाबदारी मिळाली,” असं त्यांनी सांगितलं.
पंडित नेहरूंसोबतची आठवण
यावेळी त्यांनी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यासोबतचा एक प्रसंगही सांगितला. “आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी पंडित नेहरूंना भेटण्याचं ठरवलं होतं. पण ते समोर आल्यानंतर आम्ही काय बोलायचं हेच विसरलो,” अशी आठवण त्यांनी सांगितली.
इंदिरा गांधींबाबतचा किस्सा
माजी पंतप्रधान इंदिरा गांधीi यांच्याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, “रशिया दौऱ्यावर असताना तिथल्या राष्ट्रपतींनी त्यांचं स्वागत केलं नव्हतं. त्यावेळी इंदिरा गांधी तिथल्या लहान मुलांसोबत खेळायला लागल्या. ते पाहून संबंधितांना त्यांची चूक लक्षात आली. इंदिरा गांधींसोबत काम करण्याची संधी मिळणं हे आमचं भाग्य होतं.”


