पुणे : महाराष्ट्रातील ‘लाडकी बहीण योजना’ आणि बिहारमधील महिलांना १० हजार रुपये जमा करण्यासारख्या निवडणूकपूर्व पैशावाटप योजनांमुळे मतदारांच्या विश्वासाला धक्का बसतो, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली. अशा पद्धतीने पैशांचे वाटप करणे योग्य आहे का, याचा विचार निवडणूक आयोगाने करावा, अशी सूचना त्यांनी केली. बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालावर याचा परिणाम झाल्याचाही दावा पवार यांनी केला.
बारामती येथे पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, “सत्ता असलेल्यांनी मतदानापूर्वी पैशांचे वाटप करून निवडणुकीला सामोरे जाणे हे लोकांच्या विश्वासाला धक्का देणारे आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे वाटप करणे योग्य आहे का, याचा विचार आता निवडणूक आयोगाने करायला हवा. यापुढे असे झाल्यास निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल.”
ते पुढे म्हणाले, “निवडणुका स्वच्छ आणि पारदर्शक पद्धतीने होणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात ‘लाडकी बहीण योजना’द्वारे पैसे वाटप झाले, तर बिहारमध्ये महिलांच्या खात्यात १० हजार रुपये जमा करण्यात आले. याचा थेट परिणाम बिहारच्या निकालावर दिसला. देशातील सुमारे ५० टक्के महिला मतदार असताना अशा योजनांमुळे निवडणुका स्वच्छ राहतात का, याबाबत लोकांच्या मनात शंका निर्माण होते. निवडणूक आयोगाने याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे.”
आयोगाची बघ्याची भूमिका?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहार निकालानंतर निवडणूक आयोगाचे आभार मानले. यावर पवार म्हणाले, “पैसे वाटप होत असताना आयोगाने बघ्याची भूमिका घेतली, त्यामुळे असे घडले.”
स्थानिक निवडणुकांबाबत पक्षाची भूमिका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत पवार म्हणाले, “या निवडणुका पक्ष म्हणून लढवल्या जात नाहीत. स्थानिक परिस्थितीनुसार पक्ष पदाधिकाऱ्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे. ते योग्य निर्णय घेतील.”
मुंबई महापौर पदावर टिप्पणी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईचा महापौर महायुतीचाच होईल, असे म्हटल्यावर पवार म्हणाले, “निवडणूक जाहीर झालेली नाही. काँग्रेस स्वतंत्र लढणार की नाही, हे माहीत नाही. पण त्यांनी असा निर्णय घेतला तर आश्चर्य वाटणार नाही.”


