माळशिरस : पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला सतत धक्के बसत असताना आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजपचे ‘ऑपरेशन लोटस’ यशस्वी होत असून, गेल्या काही महिन्यांत अनेक नेते व कार्यकर्ते पक्षांतर करून भाजपत सामील झाले आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील व त्यांच्या पत्नी, माजी पंचायत समिती सदस्य श्रीलेखा पाटील यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दोघेही ७ नोव्हेंबरला शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
प्रकाश पाटील हे विजयसिंह मोहिते पाटील यांचे पारंपारिक विरोधक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे माळशिरस तालुक्यातील भाजपची ताकद आणखी वाढेल, असा विश्वास भाजप नेत्यांनी व्यक्त केला आहे. हा सोहळा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत पार पडणार असून, यामुळे काँग्रेसचे स्थान आणखी कमकुवत होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूरसह इतर जिल्ह्यांतही काँग्रेसला अनेक धक्के बसले आहेत. कोल्हापूरमधील विनायक उर्फ अप्पी पाटील यांनी नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केला असून, त्यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सामील झाले. अशा घडामोडींमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसची कमजोरी उघड होत आहे, तर विदर्भात मात्र पक्षात इनकमिंग सुरू असल्याचेही सांगितले जाते.


