Politics News : तामिळनाडूच्या राजकारणात मोठा स्फोटक घडामोडींचा सिलसिला सुरू असून अभिनेता-राजकारणी विजय यांच्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ पक्षाने मोठा इशारा दिला आहे. जर डीएमके आणि एआयडीएमके यांनी एकत्र येत सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला, तर TVK चे सर्व १०७ आमदार सामूहिक राजीनामा देतील, अशी माहिती विविध वृत्तसंस्थांनी दिली आहे.
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत TVK हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला असला तरी स्पष्ट बहुमतासाठी आवश्यक आकडा गाठता आलेला नाही. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर डीएमके आणि एआयडीएमके या पारंपरिक प्रतिस्पर्धी पक्षांमध्ये पडद्यामागे चर्चा सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, TVK ला वाटते की जनादेश त्यांच्या बाजूने असून त्यांना सरकार स्थापनेसाठी पहिली संधी मिळायला हवी. जर विरोधकांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली तर ते जनादेशाचा अपमान ठरेल, अशी पक्षाची भूमिका आहे. त्यामुळेच सामूहिक राजीनाम्याचा पर्याय पुढे करण्यात आला आहे.
सध्या संपूर्ण देशाचे लक्ष तामिळनाडूतील या राजकीय नाट्याकडे लागले असून पुढील काही तासांत राज्यपालांची भूमिका आणि पक्षांची पुढची रणनीती स्पष्ट होण्याची शक्यता आहे.


