Duplicate Voter In Mumbai: मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकांची तयारी सुरू असतानाच मतदारयादीतील गंभीर त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील यादीत तब्बल 11 लाखांपर्यंत दुबार नावे असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेने स्वतः कबूल केले की काही नावे दोन-तीन वेळा नव्हे, तर काही प्रकरणांमध्ये एका मतदाराचे नाव 103 वेळा नोंदवले गेले आहे.
मुंबईत एकूण 4 लाख 33 हजार मतदारांची नावे एकापेक्षा जास्त वेळा नोंदली गेल्याने एकत्रितपणे दुबार नोंदींचा आकडा लाखोंमध्ये गेला आहे. त्यामुळे मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेले आरोप खरे ठरल्याचे चित्र दिसत आहे.
हेही वाचा – मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचा ‘एकला चलो रे’चा नारा
दुबार नावे हटवण्यासाठी विशेष मोहीम
मतदारयादी स्वच्छ करण्यासाठी महापालिकेकडून अतिरिक्त वेळ मागण्यात आला असून, 23 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या काळात विशेष मोहीम राबवली जाणार आहे. प्रत्येक 24 वॉर्डांतील निवडणूक कार्यालयांतून सहाय्यक आयुक्त या प्रक्रियेवर काम करतील. तथापि, कोणते नाव किती वेळा पुनरावृत्तीने नोंदले गेले आहे याचा स्पष्ट हिशोब प्रशासनाकडे नसल्याची कबुलीही देण्यात आली.
राज ठाकरे–उद्धव ठाकरे यांचे निवडणूक आयोगाला संयुक्त पत्र
मतदारयादीतील गोंधळ, चुकीचे विभाजन आणि माहितीतील त्रुटी याबाबत चिंता व्यक्त करत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी आयोगाला संयुक्त पत्र पाठवले होते.


