मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीतील घटक पक्ष असलेले भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्याकडे अर्थमंत्रीपद असल्याचे सांगत मत मागत आहेत. भाजपा नेते अजित पवारांना प्रत्युत्तर देताना म्हणत आहेत की, तिजोरी तुमच्याकडे असली तरी मालक आमच्याकडे आहे. अशातच शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी मालवणमध्ये भाजपा पदाधिकारी विजय केनवडेकर यांच्या घरी धाड टाकली आणि लाइव्ह शुटींग करत त्यांच्या घरात 25 लाख रुपये असल्याचे दाखवले होते.
यानंतर आज 28 नोव्हेंबरला अजित पवार गटाच्या महिला कार्यकर्त्या पैशांनी भरलेली पाकिटे वाटत असल्याचा आरोप करीत शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांनी या महिला कार्यकर्त्यांना रंगेहाथ पकडले. याचपार्श्वभूमीवर आता विरोधक महायुतीवर टीका करताना दिसत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीत पैशांचा धूर दिसतोय, असा आरोप केला आहे.
राज्यामध्ये आपण बघितलं तर निवडणुकांचं वातावरण आहे. सगळं सरकार, मग मुख्यमंत्री असतील किंवा त्यांचे दोन सरकारी असतील. मी उपमुख्यमंत्री म्हणत नाही कारण ते संविधानिक पद नाही. तसेच सगळं मंत्रिमंडळ राज्यात प्रचारासाठी फिरत आहे. गावागात किंवा जिथे जिथे निवडणुका आहेत, तिथे जाऊन मत मागत आहे. मात्र या प्रचाराच्या दरम्यान, तेही स्थानिक स्वराज्य स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कधीही नव्हता एवढा पैशांचा धूर निघताना दिसत आहे, असा आरोप त्यांनी केला.
उद्धव ठाकरे म्हणाले की, पैशांचा वाटप, पैशांचा पाऊस किंवा अतिवृष्टी भयानक पद्धतीने महाराष्ट्रात सुरू आहे. एकप्रकारे सत्तेचा माज, सत्तेजा दर्प या सर्व राज्याकर्त्यांच्या वक्तव्यातून आणि त्यांच्या वागणुकीतून महाराष्ट्र पाहतोय. ज्याप्रकारे मी आठ-दहा दिवसांपूर्वी मराठवाड्यात शेतकऱ्यांसोबत जाऊन बसलो होतो, तेव्हा त्यांची दु:ख, वैदना आणि व्यथा समजून घेण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांना धीर दिला. त्याप्रमाणे एकही मंत्री शेकऱ्यांसोबत जाऊन बसत नाही, नागरिकांशी बोलत नाही, फक्त जिथे जात आहेत, तिथे पैशांच्या थैल्या उघडल्या जात आहेत आणि मतं मागितली जात आहेत.


