Tapovan Tree Cutting: नाशिकमधील कुंभमेळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल करण्याचा प्रस्ताव सरकारकडून मांडण्यात आला असून यावरून राजकीय आणि सामाजिक वातावरण दिवसेंदिवस अधिक तापत आहे. तपोवन परिसरातील झाडे तोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्यानंतर शहरातील राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. साधुग्राम उभारणीसाठी वृक्षतोड अनिवार्य असल्याचा राज्य सरकारचा ठाम आग्रह असताना, पर्यावरणप्रेमींनी मोठे जनआंदोलन उभे केले आहे. या संघर्षाच्या केंद्रस्थानी अभिनेते आणि ‘सह्याद्री देवराई’ संस्थेचे प्रमुख सयाजी शिंदे यांनी घेतलेली आक्रमक भूमिका लक्षवेधी ठरली आहे.
सयाजी शिंदेंनी घेतली राज ठाकरेंची भेट
सोमवारी सकाळी सयाजी शिंदे यांनी मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्यासह मुंबईतील शिवतीर्थ येथे मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. दोघांमधील चर्चेचे स्वरूप गुप्त ठेवले असले तरी तपोवनातील वृक्षतोडीविरोधातील मनसेची ठाम भूमिका लक्षात घेता, पुढील काळात या आंदोलनात दोघेही एकाच भूमिकेत उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
झाडं म्हणजे आमचे आई-बाप
तपोवनातील एकाही झाडाला हात लावू देणार नाही, असा ठाम पवित्रा शिंदे यांनी गेल्या काही दिवसांत व्यक्त केला आहे. साधू येतात-जातात, त्याने काही फरक पडत नाही. पण झाडं गेली तर नाशिककरांचे नुकसान ठरेल. झाडं म्हणजे आमचे आई-बाप. आमच्या आईबापांवर हल्ला झाला तर आम्ही गप्प बसणार नाही, असं सयाजी शिंदेंनी म्हटलं होतं. राजकीय वैमनस्याचा यात संबंध नसल्याचे सांगत त्यांनी गिरीश महाजन यांनी या बाबत स्पष्ट भूमिका मांडली पाहिजे, अशी मागणी केली होती.
हेही वाचा – साधू-संतांना तरी झाडांची कत्तल केलेली पटेल का? सयाजी शिंदेंचा सरकारला संतप्त सवाल
महापालिकेत आज निर्णायक बैठक
तपोवनातील वृक्षतोडीच्या प्रश्नावर आज दुपारी 12 वाजता नाशिक महापालिकेत महत्त्वाची बैठक होणार आहे. पर्यावरणप्रेमींचे प्रतिनिधी आणि मनपा प्रशासन यांच्यात ही चर्चा होईल. मनपाचे म्हणणे आहे की, कुंभमेळ्यासाठी साधुग्रामाची उभारणी करायची असेल तर काही वृक्षतोड आवश्यक आहे. तथापी, तपोवनातील एकही झाड तोडू देणार नाही, अशी भूमिका पर्यावरणप्रेमींनी घेतली आहे. गेल्या 15 दिवसांपासून चालू असलेल्या आंदोलनामुळे हा वाद आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक एकत्र येऊन विरोध तीव्र करीत असल्याने तपोवनातील झाडांचे भवितव्य पुढील काही दिवसांत ठरणार आहे.


