नागपूर : महाराष्ट्र विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शिवसेना (ठाकरे गट) चे आमदार भास्कर जाधव यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी १० टक्के सदस्यसंख्येची अट कायद्यात कुठेही नसल्याचा दावा करत जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्याच विधीमंडळ सचिवांच्या पत्राचे वाचन करण्याचा सल्ला दिला. “१० टक्के सदस्य पाहिजे हे कुठे म्हटले आहे? दाखवा.” असा संतप्त सवाल उपस्थित करत जाधव यांनी सरकारला ‘दुटप्पी’ म्हटले.
नागपूर येथील विधान भवनाबाहेरील पत्रकार परिषदेत बोलताना जाधव म्हणाले, “आधी विरोधी पक्षनेतेपदाची निवड घोला, मगच अधिवेशन चालवा. ही अट संविधानात किंवा कायद्यात नाही. शिवसेना (युबीटी) ने मार्च महिन्यातच माझे नाव सभापतींना शिफारस केले होते, पण अद्याप निर्णय नाही.” महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेते पद रिक्त आहे, ज्यामुळे लोकशाहीला धक्का बसत असल्याचा आरोप जाधव यांनी केला.
विरोधकांचा चहा पानावर बहिष्कार
हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला (७ डिसेंबर) विरोधकांनी सरकारच्या पारंपरिक चहा पार्टीचा बहिष्कार टाकला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, जाधव, सुनिल प्रभू आणि एनसीपी (शरद पवार) चे अनिल देशमुख यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. “चहा पार्टीचे निमंत्रण वैयक्तिक आमदारांना पाठवले, विरोधी पक्षनेत्यांना नाही. हे पद रिक्त ठेवून सरकार संविधानाचा अवमान करतेय,” असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.
शिवसेना (युबीटी) कडे २०, काँग्रेसकडे १६ आणि एनसीपी (एसपी) कडे १० आमदार आहेत. एकत्रित ४६ सदस्य असूनही १० टक्केच्या अटीमुळे पद मिळत नसल्याचा दावा विरोधक करत आहेत. उद्धव ठाकरे यांनीही या मागणीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली होती, पण अद्याप निर्णय नाही.


