Nitesh Rane on Tapovan tree cutting : नाशिकमधील ऐतिहासिक तपोवन परिसरात २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी साधूग्राम उभारण्याच्या नावाखाली १८०० हून अधिक झाडांची तोड करण्याच्या प्रस्तावाने पर्यावरणप्रेमी, स्थानिक नागरिक आणि सेलिब्रिटींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ११५० एकरांवर उभारल्या जाणाऱ्या या भव्य साधूग्रामासाठी राम-सीतेच्या वनवासस्थळी असलेल्या तपोवनातील हिरवाई धोक्यात आहे.
विरोधकांसह उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनीही या निर्णयाला शब्दांत टोला लगावला आहे. मात्र, या संवेदनशील मुद्द्यावर भाजप मंत्री नितेश राणे यांनी ‘ईद’ आणि ‘बकरी कुर्बानी’चा संदर्भ घेऊन वादग्रस्त विधान केल्याने राजकीय वाद तापला आहे. यावर शिवसेना (ठाकरे गट) ने जोरदार प्रत्युत्तर देत राणेंना ‘टिल्लू लेव्हल बुद्धी’ असल्याचा समाचार घेतला आहे.
नितेश राणेंचा ‘सर्वधर्म समभाव’चा सवाल
नितेश राणे यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले की, “तपोवनमधील वृक्षतोडीची चिंता करणारे पर्यावरणवादी कधीच ईदच्या वेळी बकरी कापण्याला विरोध करताना दिसत नाहीत. तेव्हा गप्प का? सर्व धर्म समभाव?” हे विधान करत त्यांनी पर्यावरणवाद्यांच्या ‘एकतर्फी’ विरोधावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. नंतर माध्यमांशी बोलताना राणे यांनी स्पष्टीकरण दिले की, “ईदमध्ये मोठ्या प्रमाणात बकऱ्यांची हत्या होते आणि रक्ताचे पाट वाहतात, तेव्हा पर्यावरणवादी गप्प का राहतात? व्हर्च्युअल बकरी ईद करा, असं कधी बोलत नाहीत.
जसं झाडांना मिठी मारतात, तसं बकऱ्यांना का मिठी मारत नाहीत? एका धर्माला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा कशाला?” राणे यांच्या मते, कुंभमेळा हा हिंदूंसाठी महत्त्वाचा उत्सव आहे आणि साधू-महंतांसाठी आवश्यक सुविधा उभारणे अपरिहार्य आहे. मात्र, या विधानाने पर्यावरण मुद्द्याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न झाल्याची टीका होत आहे.
मुंबईत माध्यमांशी बोलताना राणे म्हणाले, “नाशिक कुंभ हा हिंदूंसाठी अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम आहे. जगभरातून साधू-भक्त येणार आहेत. यासाठी तपोवनातील जमीन साधूग्रामसाठी वापरली जात आहे. प्रत्येक मोठ्या कुंभात पाणी, झाडे किंवा जमिनीवर अनावश्यक प्रश्न उपस्थित केले जातात. हा हिंदू उत्सव आणि परंपरांना बदनाम करण्याचा षडयंत्राचा भाग आहे.”
ठाकरे गटाचा जोरदार हल्लाबोल; ‘टिल्लू लेव्हल बुद्धी’
नितेश राणेंच्या या वक्तव्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने तात्काळ प्रत्युत्तर दिले. राज्य संघटक अखिल चित्रे यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत लिहिले की, “वृक्षतोड हा पर्यावरणाचा विषय आहे, धर्माचा नाही. टिल्लू-स्तराची बुद्धी असलेल्याला वृक्षतोडसारखा गंभीर विषय कुठून समजणार? टिल्लू-लेव्हल बुद्धीत वृक्षतोड बसणार तरी कुठे? त्याच्या सिस्टीममध्ये तर हिंदू-मुस्लीम, बकरा-कोंबडीच फिरतात, वृक्षतोडची फाईल तर ‘अनसपोर्टेड फॉर्मेट’ म्हणूनच उघडत नाही!” चित्रे यांच्या या पोस्टने सोशल मीडियावर खळबळ उडवली असून, नेटकऱ्यांनीही राणेंवरून काँग्रेस आणि इतर विरोधकांनीही टीका केली आहे.
याशिवाय, शिवसेना (UBT) नेते अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलत म्हटले, “झाडे आणि बकरी यात फरक आहे. नितेश राणे हे स्वतःच भाजपचे ‘बकरे’ आहेत. भाजप कधी त्यांना कापणार?” तर किशोरी पेडणेकर यांनीही राणेंवर निशाणा साधला आहे. एकनाथ शिंदे गटातील संजय शिरसाट यांनी मात्र हे विधान ‘वैयक्तिक मत’ असल्याचे सांगितले आणि हिंदुत्व व झाडांचा संबंध नाही, असे स्पष्ट केले.


