धाराशिव : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेतील संघर्ष आता अधिक तीव्र झाला आहे. रायगड, नाशिकसारख्या ठिकाणी आधीच मतभेद दिसले असताना, आता धाराशिवमध्ये शिवसेना आमदार तानाजी सावंत यांच्या वादग्रस्त वक्तव्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
राष्ट्रवादीला सत्तेशिवाय राहता येत नाही, ही ‘औलाद’ पाण्यातून बाहेर काढलेल्या माशाप्रमाणे तडफडते, असे म्हणत सावंत यांनी पक्षावर जहरी टीका केली आहे. या विधानाने महायुतीत तणाव वाढला असून, राष्ट्रवादीने कडाक्याच्या प्रत्युत्तरासह सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे.
धाराशिवमधील एका सभेत बोलताना माजी मंत्री आणि विद्यमान आमदार तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला. “राष्ट्रवादीची औलाद अशी आहे की, ती सत्तेशिवाय राहू शकत नाही. पाण्यातून मासा बाहेर काढला की कसा तडपडतो, तसेच राष्ट्रवादीला होत आहे,” असे ते म्हणाले.
याच सभेत त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी (अजित पवार आणि शरद पवार गट) एकच आहेत, असा दावा करत गेल्या महिन्यातील घटनांचा उल्लेख केला. “दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत, हे मी सांगितले होते. महाराष्ट्रातील मी एकमेव आमदार आहे जो हे बोलतो,” असे सावंत म्हणाले.
धाराशिवमध्ये सावंतांना घेरण्याची रणनीती
सावंतांच्या वक्तव्याने धाराशिवमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. भाजप, शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी आणि काँग्रेससह सर्वपक्षीय नेते एकत्र येऊन सावंतांना घेरण्यासाठी रणनीती आखत आहेत. परंडा नगरपरिषद आणि भूम नगरपालिका निवडणुकीत हे गठबंधन उतरणार असल्याची चर्चा आहे.
यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली असून, सावंत यांनी यावर प्रतिक्रिया देताना, “मी ‘एकला चलो रे’चा नारा दिला नाही, मोठ्या पक्षाने विश्वासघात केला. आम्ही सर्व जागा लढवण्यास तयार आहोत. ते सर्व एकत्र येत असतील तरच आमचा विजय निश्चित आहे,” असे म्हटले.


