Gwalior–Jhansi highway : मध्य प्रदेशातील ग्वालियर-झांसी महामार्गावर रविवारी सकाळी साडेसहा वाजता झालेल्या साखळी अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. झांसीकडून ग्वालियरकडे वेगाने येणारी टोयोटा फॉर्च्युनर कार महाराजपुरा परिसरात वाळूने भरलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला मागून जोरदार धडकली.
हा अपघात इतका भयानक होता की, कारमधील पाचही मित्र जागीच मृत्यूमुखी पडले. सकाळच्या धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्याने आणि कारचा अतिघातक वेग यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिस धावले. कारचा पुढील भाग ट्रॉलीमध्ये अडकल्याने मृतदेह बाहेर काढणे कठीण झाले. कटरने कार कापून मृतदेह बाहेर काढण्यात आले. अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.
पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह जवळच्या रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवले. मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. ट्रॅक्टर चालकाचा अद्याप शोध लागला नसल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
मृतांमध्ये पाच मित्रांचा समावेश असल्याचे प्राथमिक माहितीनुसार समोर आली आहे. त्यांची नावे आणि इतर तपशील अद्याप जाहीर झाले नाहीत. पोलिस तपासात सहकार्य करण्यासाठी स्थानिकांना आवाहन केले आहे. या अपघाताने परिसरातील लोकांमध्ये भीती पसरली असून, महामार्गावरील वेग नियंत्रण आणि धुक्यात वाहन चालवण्याबाबत जनजागृतीची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे. पोलिसांनी वाहनचालकांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे.


