Nandurbar News : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा सध्या उसळत असताना काँग्रेस पक्षाला नंदुरबार जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांनी आपल्या पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना अधिकृतपणे पाठवला असून, यामुळे पक्षांतर्गत खळबळ उडाली आहे. राजीनाम्यात नाईक यांनी “प्रकृतीच्या कारणास्तव” पद सोडत असल्याचं नमूद केलं असलं तरी, नगरपालिका निवडणुकीनंतर आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या काही दिवस आधी घडलेल्या या घटनेमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.
नंदुरबारमध्ये नुकतेच काही नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या असून, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या निवडणुका डोळ्यांसमोर असताना हा राजीनामा आलाय. काँग्रेससाठी नंदुरबार हा पारंपरिक बालेकिल्ला असून, येथे सुरुपसिंग नाईकांसारख्या ज्येष्ठ नेत्यांचा प्रभाव आहे. मात्र, नाईक यांच्या अचानक निर्णयामुळे पक्षाच्या संघटनात्मक तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, अंतर्गत मतभेद किंवा निवडणुकीतील अपयशाची भीती असण्याची शक्यता नाकारता येत नाही, जरी अधिकृत कारण प्रकृतीचं असलं तरी.
काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांमध्ये या राजीनाम्यामुळे अस्वस्थता पसरली असून, “येणाऱ्या निवडणुकांवर परिणाम होईल का?” ही चर्चा जोरात आहे. नंदुरबारमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी असली तरी, भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांचा प्रभाव वाढत आहे.नाईक यांच्या जागी नव्या नेत्याची नियुक्ती लवकर होणं आवश्यक असून, प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी याबाबत तातडीने पावलं उचलावीत, असा मतप्रदर्शन पक्षांतर्गत होत आहे. सध्या नंदुरबार काँग्रेस कमिटीची चर्चा जोरात असून, नेत्यांच्या भेटीगाठींना वेग आला आहे.
हा राजीनामा काँग्रेससाठी केवळ नंदुरबारपुरता मर्यादित राहणार नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील स्थानिक निवडणुकांसाठी धोक्याची घंटा ठरू शकतो. पक्षाने आता संघटन मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करावं, अन्यथा महायुतीला फायदा होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.


