नवी दिल्ली : भारतीय जीवन विमा महामंडळ अर्थात एलआयसीने जनतेसाठी दोन नवीन योजना सुरू केल्या आहेत. या योजना म्हणजे प्रोटेक्शन प्लस आणि बिमा कवच. या योजना जीवन विम्यासोबतच बचतीचीही हमी देतात. प्रोटेक्शन प्लस योजनेअंतर्गत गुंतवणूक केल्याने दीर्घकालीन निधी निर्मिती शक्य होते, तर बिमा कवच आर्थिक सुरक्षा प्रदान करते.
या दोन्ही एलआयसी योजनांचे उद्दिष्ट लोकांना एक साधी, फायदेशीर आणि विश्वासार्ह दीर्घकालीन पॉलिसी प्रदान करणे आहे, ज्यामुळे विमाधारक आणि कुटुंबाला संकटाच्या काळात आर्थिक सुरक्षा मिळते. एलआयसी प्रोटेक्शन प्लस ही योजना ज्यांना विमा बचतीशी जोडायचा आहे किंवा विम्यासोबत गुंतवणूक करून निधी उभारायचा आहे, त्यांच्यासाठी ही योजना फायद्याची ठरू शकते. ती केवळ मृत्यू कव्हरच नाही तर गुंतवणूक/युनिट फंड-आधारित फंड मूल्य देखील प्रदान करते. ही योजना तुमचे पैसे बाजाराशी जोडते, परिणामी पारंपारिक एलआयसी पॉलिसींपेक्षा जास्त परतावा मिळतो.
या पॉलिसीचे अनेक फायदे आहेत. त्यात ही एलआयसी पॉलिसी १८ ते ६५ वर्षे वयोगटातील लोकांसाठी उपलब्ध आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार १०, १५, २० किंवा २५ वर्षांचा पॉलिसी टर्म निवडू शकता. प्रीमियम पेमेंट टर्म ५, ७, १० किंवा १५ वर्षे आहे, म्हणजे तुम्ही एका निश्चित कालावधीत प्रीमियम भरू शकता. विमा रक्कम वार्षिक प्रीमियमच्या किमान ५ ते ७ पट आहे. टॉप-अप प्रीमियम सुविधा आहे; तुम्ही अतिरिक्त प्रीमियम भरून फंड मूल्य वाढवू शकता.


