डोंबिवली : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीत शिवसेना (शिंदे गट)च्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरेंचे नाव न घेता त्यांनी तिखट टीका करत म्हटले, “मुंबई ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी तिला पकडून ठेवली आणि बाकी महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडलं. आता जनता त्यांना वाऱ्यावर सोडणार आहे.” या भाषणाने राजकीय वातावरण तापले असून, आगामी निवडणुकांसाठी शिंदे गटाची तयारी दिसून आली.
कार्यक्रमात विकास म्हात्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले. यावेळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. शिंदे यांनी विकासकामे, लाडकी बहीण योजना आणि पक्ष संघटनेवर भर देत विरोधकांवर हल्ला चढवला. ते म्हणाले, “आमचे खासदार डॉक्टर आहेत, पण मी डॉक्टर नसलो तरी ऑपरेशन बरोबर करतो,” असा टोला महाविकास आघाडीला लगावला.
उद्धव ठाकरेंवर थेट प्रहार करत शिंदे पुढे म्हणाले, “उपमुख्यमंत्री पद घटनाबाह्य म्हणता? मुख्यमंत्री असतानाही घटनाबाह्य म्हणता. त्यांची पोटदुखी थांबतच नाही. बाळासाहेबांच्या नावाने दवाखाना काढला तरी आराम मिळत नाही. आता तुम्हीच त्यांना जमालगोटा द्या.” पत्रकारांनी महाविकास आघाडी कुठे आहे, असा प्रश्न विचारल्यावर शिंदे म्हणाले, “घरी बसली आहे,” असा तिखट प्रत्युत्तर दिला.
शिंदे यांनी डोंबिवली-कल्याण परिसराच्या विकासावर भर देत म्हटले, “विकास म्हात्रे यांच्या पॅनलमुळे स्थानिक कामांना गती मिळेल. पक्ष संघटन मजबूत करून आगामी निवडणुका जिंकू.” कार्यक्रमात खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले, “महायुती एकत्र राहिली पाहिजे. कल्याण-डोंबिवली महापालिकेवर महायुतीचा महापौर बसवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. निवडणुका महायुतीनेच लढवल्या पाहिजेत.”
या कार्यक्रमाने शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असून, महिला कल्याण आणि विकासाच्या मुद्द्यांवरून विरोधकांना घेरण्याची रणनीती स्पष्ट झाली. आगामी महापालिका निवडणुकांत कोण बाजी मारेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


