Rain Alert : राज्यात सध्या एकीकडे कडक उन्हाचा तडाखा जाणवत असतानाच दुसरीकडे अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. हवामानात अचानक बदल झाल्यामुळे मुंबई, ठाणे, पालघर, कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पुढील काही तास आणि दिवस नागरिकांसाठी महत्त्वाचे ठरणार असून राज्यातील २४ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, विदर्भातील अकोला आणि वर्धा येथे काल ४५ अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली. आजही उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, दुसरीकडे राज्यातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने वातावरणात मोठा बदल होत आहे.
दरम्यान, बदलापूर परिसरात आज सकाळी अचानक पावसाने हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून ४० अंशांपेक्षा जास्त तापमानाचा सामना करणाऱ्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला, मात्र कामावर जाणाऱ्या नोकरदारांची तारांबळ उडाली. अनेकांना भिजतच रेल्वे स्थानक गाठावे लागले.
यवतमाळ, अमरावती आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये रात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून, वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे कोसळली आणि वीजपुरवठा खंडित झाला. विशेषतः तीळ पिकांवर या पावसाचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे.


