Delhi–Mumbai Expressway accident News : राजस्थानातील अलवर जिल्ह्यात दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर बुधवारी पहाटे एक भीषण अपघात घडला. दिल्लीहून जयपूरकडे जात असलेल्या एका पिकअप वाहनाची अन्य वाहनांना जोरदार धडक बसली. टक्करेनंतर काही सेकंदातच पिकअपने पेट घेतला आणि आगीचा भडका उडाला. या दुर्घटनेत पिकअपमधील तीन प्रवाशांचा जिवंत जळून मृत्यू झाला, तर चालक गंभीर जखमी झाला आहे.
ही घटना रेणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत पहाटे घडली. पिकअप जळून पूर्णपणे खाक झाली असून, आत अडकलेल्या तिघांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. स्थानिकांनी आणि पोलीसांनी तात्काळ बचावकार्य केले, मात्र आग वेगाने पसरल्याने तीन जणांना वाचवता आले नाही. जखमी चालकाला जयपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही, तर त्यांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.
अपघातानंतर एक्सप्रेसवेवर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. या अपघातामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिकांच्या मते पिकअपमधील प्रवाशांच्या किंचाळ्या आणि आरडाओरडाने हादरा बसला होता.
पोलीस तपासात अपघाताचे नेमके कारण समोर येईल, मात्र प्राथमिक माहितीनुसार धडकेची तीव्रता आणि आग लागण्याचा वेग यामुळे ही दुर्घटना अधिक भयानक ठरली. हिवाळ्यात एक्सप्रेसवेवर असे अपघात वाढण्याची शक्यता असते, त्यामुळे वाहनचालकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.


