पुणे : महानगरपालिका निवडणुकीत कुख्यात गुंड बंडू आंदेकर आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या उमेदवारीने मोठी खळबळ माजली आहे. न्यायालयाच्या परवानगीने बंडू आंदेकर, पत्नी लक्ष्मी आंदेकर आणि मुलगी सोनाली आंदेकर यांना निवडणूक लढवता येणार आहे. शनिवारी लक्ष्मी आणि सोनाली यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर बंडू आंदेकर हातात बेड्या आणि गळ्यात दोरखंड असतानाही मोठ्या घोषणाबाजी करीत भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात पोहोचले. मात्र त्यांचा अर्ज अर्धवट असल्याने तो स्वीकारला गेला नाही. सोमवारी ते पुन्हा अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे.
या घडामोडींनंतर गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी गोळ्या झाडून खून झालेल्या आयुष कोमकरच्या आई कल्याणी कोमकर यांनी बंडू आंदेकरांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन संतप्त सवाल उपस्थित केले आणि अजित पवारांना मोठी मागणी केली आहे.
कल्याणी कोमकर म्हणाल्या की आंदेकरांना निवडणूक अर्ज भरण्याची परवानगी देणे चुकीचे आहे. ते मुद्दाम अर्ज चुकवतात आणि येथेच राहून निवडणूक लढवणार आहेत. त्यांना अर्ज भरण्याची परवानगी द्यायला नको होती. आंदेकरांनी लोकांची घरे उध्वस्त केली आहेत. त्यांनी लोकांची काय कामे केली आहेत असा सवाल त्यांनी उपस्थित केला. लोकांनी आंदेकर कुटुंबीयांना मतदान करू नये आणि निवडून देऊ नये असे आवाहनही त्यांनी केले. कोणत्याही पक्षाने त्यांना उमेदवारी फॉर्म देऊ नये अशी मागणी त्यांनी केली.
कल्याणी कोमकर पुढे म्हणाल्या की मी स्वतः निवडणूक लढवणार आहे. अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी मला उमेदवारी द्यावी. अजित पवार कोयता गँग थांबवा असे म्हणतात तर मग आंदेकरांना तिकीट देऊ नये. जर कोणी पक्ष त्यांना तिकीट दिले तर त्या पक्षाच्या कार्यालयाबाहेर मी आंदोलन करेन. मी अपक्ष लढणार नाही तर पक्षाकडून तिकीट हवे आहे. अजित पवारांना भेटण्याचा प्रयत्न केला पण गर्दीमुळे भेट झाली नाही. आम्हालाही निवडणूक लढवण्याची परवानगी मिळावी अशी मागणी त्यांनी केली.
वनराज आंदेकर माझा भाऊ होता तरी मी त्याची सुपारी का देऊ असा सवाल करीत कल्याणी कोमकर म्हणाल्या की वनराजच्या हत्येत आमचा किंवा माझ्या मुलांचा संबंध नाही. आम्ही काहीच केले नाही तरी आम्ही भोगतोय. आंदेकरांना अपक्ष लढू द्या पण पक्षाकडून नाही. त्यांनी विजय निंबाळकर निखील आखाडे आयुष कोमकर गणेश काळे यांसारख्या अनेकांचे खून केले आहेत असे गंभीर आरोप त्यांनी केले.


