पुणे : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर गेल्या सात वर्षांत प्रचंड भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. यावर भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी (३ जानेवारी) पुण्यात पत्रकार परिषद घेऊन जोरदार प्रत्युत्तर दिले.
“अजित पवारांनी सर्वप्रथम स्वतःच्या पक्षाकडे पाहावे. ते नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील पक्षावर आरोप करतायत, हे ध्यानात ठेवावे. आरोप-प्रत्यारोप कसे करावेत हे त्यांनी ठरवावे. आम्ही आरोप केले तर त्यांना फार अडचणी होतील, याची काळजी घ्यावी,” असा खडसावत चव्हाणांनी दादांना इशारा दिला.
चव्हाण पुढे म्हणाले, “ही निवडणूक पुण्याच्या विकासासाठी आहे. जनतेला चांगल्या नागरी सुविधा कोण देऊ शकते, हाच खरा मुद्दा आहे. नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात केंद्र आणि राज्यातील महायुती सरकार गतिमान काम करत आहे. कोरोनामुळे निवडणूक लांबली, आता विकासाला गती देण्याची वेळ आहे.
पुणे मेट्रोचा ठराव महापालिकेत झाला, पण महाविकास आघाडीला सत्ता असतानाही मेट्रो सुरू करता आली नाही. मोदी सरकार आल्यावर ३३ किलोमीटरचे मेट्रो जाळे तयार झाले. कोट्यवधी रुपये पुण्याच्या पायाभूत सुविधांसाठी दिले जात आहेत.”
या प्रत्युत्तरामुळे निवडणुकीतील वातावरण तापले आहे. पिंपरी-चिंचवड आणि पुणे महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असताना अजित पवारांचे आरोप आणि भाजपचे प्रत्युत्तर यामुळे महायुतीत अंतर्गत कलह उघड झाला आहे. १५ जानेवारीला मतदान असून, या आरोप-प्रत्यारोपांची लढत आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. राजकीय वर्तुळात चव्हाणांच्या इशाऱ्याची जोरदार चर्चा सुरू आहे.


