Laxman Hake: ‘पवार कुटुंब कधीही फुटलेले नव्हते आणि भविष्यातही ते एकत्रच राहतील. निवडणुकांचे निकाल लागताच सुप्रिया सुळे केंद्र सरकारमध्ये मंत्री पदावर दिसतील, तर रोहित पवार यांची राज्याच्या मंत्रिमंडळात वर्णी लागेल, असे भाकीत लक्ष्मण हाके यांनी वर्तवले आहे. या विधानामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. अजित पवारांच्या कार्यशैलीवर तोफ डागताना हाके म्हणाले की, पुण्यात तिकीट वाटप करताना गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना झुकते माप दिले जात आहे. एकीकडे पुरोगामी नाव घ्यायचे आणि दुसरीकडे गुन्हेगारांना जवळ करायचे, हे अजित पवारांचे दुटप्पी राजकारण आहे. सत्ता आल्यावर भूखंड हडप करणे हाच त्यांचा अजेंडा असतो. ते जनतेचे सेवक नसून अदानींप्रमाणे केवळ एक व्यावसायिक आहेत, असा घणाघाती आरोप त्यांनी केला.
शरद पवारांचे मोदी-शाहांशी थेट ‘कनेक्शन’
शरद पवारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना हाके म्हणाले की, पवारांचे बोलणे आणि वागणे यात मोठी तफावत आहे. पवार साहेब राज्यातील भाजप नेत्यांना जुमानत नाहीत, कारण त्यांचे थेट संबंध पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्याशी आहेत. ते भाजपसोबत जाणार नाही असे म्हणत असले, तरी पडद्यामागे सूत्रे वेगळीच हालतात, असा संशय त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, भाजपवर टीका करताना लक्ष्मण हाके यांनी कार्यकर्त्यांच्या अस्वस्थतेवर बोट ठेवले. भाजप स्वतःला ‘गंगा’ म्हणते, पण त्यांनी अजित पवारांसारखी भ्रष्टाचाराची गटारगंगा स्वतःमध्ये सामावून घेतली आहे. ज्यांच्या विरोधात लढण्यासाठी कार्यकर्त्यांनी रक्त आटवले, त्यांनाच सत्तेत बसवल्यामुळे भाजपचा सामान्य कार्यकर्ता आज प्रचंड नाराज आहे, असे ते म्हणाले.
कार्यकर्ता वाऱ्यावर, गुंडगिरीचा बोलबाला
राज्यातील सध्याच्या युत्यांवर भाष्य करताना हाके यांनी याला ‘खेळखंडोबा’ संबोधले. सगळेच पक्ष एकमेकांशी छुपे साटेलोटे करून बसले आहेत. ठाकरे-मनसे जवळ येत आहेत, काँग्रेस-वंचितची चर्चा सुरू आहे. या गोंधळात निष्ठावान कार्यकर्ता बाजूला फेकला गेला असून, आगामी निवडणुका केवळ पैसा आणि बाहुबलाच्या जोरावर लढल्या जातील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.


