Kolhapur Crime: कोल्हापूर जिल्हयातील शिरोळ तालुक्यातून एक सुन्न करणारी घटना समोर आली आहे. चिपरी येथील एका २७ वर्षीय विवाहितेने सासरच्या अमानुष छळाला कंटाळून स्वतःला संपवले आहे. ‘मूल होत नाही’ या कारणावरून होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून या महिलेने टोकाचे पाऊल उचलले. याप्रकरणी जयसिंगपूर पोलिसांनी पतीसह सासरच्या चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
नेमकी घटना काय?
चिपरी येथील रहिवासी कोमल ऊर्फ कीर्ती किशोर आवळे (वय २७) हिचा विवाह किशोर आवळे याच्याशी झाला होता. लग्नानंतर काही काळ ठीक गेल्यानंतर तिला अपत्य होत नसल्याच्या कारणावरून सासरच्या मंडळींनी छळ सुरू केला. “तू वांझोटी आहेस, किशोरचे दुसरे लग्न करून देतो,” अशा धमक्या देत तिला वारंवार मानसिक आणि शारीरिक रित्या दुखावले जात होते. या सततच्या त्रासामुळे खचलेल्या कोमलने ८ जानेवारी रोजी अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेतले.
उपचारादरम्यान मृत्यू आणि पोलीस कारवाई
पेटवून घेतल्यानंतर गंभीर भाजलेल्या कोमलला तातडीने सांगली सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र, तिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि शुक्रवारी रात्री तिने अखेरचा श्वास घेतला. या घटनेनंतर कोमलचे नातेवाईक कुमार कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी पती किशोर पट्टू आवळे, सासू शोभा पट्टू आवळे, दीर अतुल आवळे, जाऊ कोमल अतुल आवळे यांना अटक केली आहे. जयसिंगपूर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६(बी) आणि ५०६ अन्वये आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवून या चौघांनाही शुक्रवारी रात्रीच अटक केली आहे.
तपास आणि सामाजिक पडसाद
पोलीस उपनिरीक्षक युनुस इनामदार या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. प्राथमिक तपासात सासरच्या छळाचे पुरावे हाती लागल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. एका तरुण विवाहितेने अशा प्रकारे जीवन संपवल्याने चिपरी परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत असून, कौटुंबिक हिंसेविरोधात कठोर कायद्याची मागणी होत आहे.


