Maharashtra Dry Day : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून, १६ जानेवारीला मतमोजणी पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उद्यापासून १६ जानेवारीपर्यंत महाराष्ट्रात ड्राय डे लागू करण्यात आला आहे.
महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार मंगळवार, १३ जानेवारी रोजी संध्याकाळी ६ वाजता संपणार आहे. याच वेळेपासून ज्या-ज्या महानगरपालिकांमध्ये मतदान होणार आहे, त्या ठिकाणी सर्व दारू दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा नियम मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर, औरंगाबादसह एकूण २९ महानगरपालिका क्षेत्रांमध्ये लागू राहणार आहे. या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करण्यासही सक्त मनाई करण्यात आली आहे.
निवडणूक काळात शांतता, सुरक्षितता आणि शिस्त राखणे हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. मद्यपानावर बंदी घातल्याने कोणतेही गैरप्रकार, दंगल किंवा अनुचित प्रकार टाळता येतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. दारू दुकानदारांना याबाबत आधीच सूचना देण्यात आल्या असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात येणार आहे. १३ ते १६ जानेवारीदरम्यान लागू असलेल्या या चार दिवसांच्या ड्राय डे मुळे मतदान प्रक्रिया शांत, सुरक्षित आणि पारदर्शक होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.


