ZP Election Announced : महानगरपालिका निवडणुकांनंतर आता राज्याचे लक्ष लागलेल्या ग्रामीण महाराष्ट्रातील सत्तेचा मुहूर्त अखेर ठरला आहे. राज्य निवडणूक आयोगाने १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचे बिगुल आज अधिकृतपणे फुंकले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत या निवडणुकांचे सविस्तर वेळापत्रक जाहीर केले असून, ग्रामीण भागात आजपासूनच आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.
निवडणुकीचे महत्त्वाचे टप्पे
- मतदान तारीख: ५ फेब्रुवारी २०२६ (गुरुवार)
- मतमोजणी आणि निकाल: ७ फेब्रुवारी २०२६ (सकाळी १० वाजल्यापासून)
- उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत: १६ जानेवारी ते २१ जानेवारी २०२६
- आचारसंहिता: १२ जिल्ह्यांत तात्काळ प्रभावाने लागू.
या १२ जिल्ह्यांत उडणार धुरळा
पहिल्या टप्प्यात ज्या जिल्ह्यांमध्ये आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या आत आहे, तिथे निवडणुका होत आहेत. यामध्ये खालील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांचा समावेश आहे.
सुप्रीम कोर्टाचा आदेश आणि मुदतवाढ
राज्य निवडणूक आयोगाने प्रशासकीय कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाकडे वाढीव वेळेची मागणी केली होती. न्यायालयाने ही विनंती मान्य करत १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. या मुदतवाढीमुळेच आयोगाला ५ फेब्रुवारीची तारीख निश्चित करता आली आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये आरक्षणाचा पेच ५० टक्क्यांच्या वर आहे, तिथे दुसऱ्या टप्प्यात निवडणुकांचे नियोजन केले जाईल.


