Ajit Pawar Plane Crash : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न आहे. मात्र, या भीषण अपघाताच्या प्राथमिक तपासात जी माहिती समोर येत आहे ती अत्यंत चकीत करणारी आणि तितकीच वेदनादायी आहे. तांत्रिक तज्ज्ञांच्या मते, विमानात जर भारताची प्रगत ‘गगन’ (GAGAN) नेव्हिगेशन प्रणाली असती, तर कदाचित हा अनर्थ टळला असता आणि महाराष्ट्राने आपला लाडका नेता गमावला नसता.
काय आहे ‘गगन’ प्रणाली आणि ती का महत्त्वाची होती?
‘गगन’ (GPS Aided Geo Augmented Navigation) ही भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आणि एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडिया (AAI) यांनी संयुक्तपणे विकसित केलेली अत्याधुनिक सॅटेलाईट यंत्रणा आहे. ही यंत्रणा वैमानिकासाठी ‘तिसरा डोळा’ म्हणून काम करते. विशेषतः खराब हवामान, अतिवृष्टी किंवा दाट धुक्यात जेव्हा धावपट्टी दिसत नाही, तेव्हा ही प्रणाली विमानाला सुरक्षित लँडिंगसाठी अचूक अंतर आणि उंचीचे मार्गदर्शन करते. बारामतीसारख्या छोट्या विमानतळावर महागडी ‘इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम’ (ILS) नसते, अशा ठिकाणी ‘गगन’ यंत्रणा सुरक्षा कवच म्हणून अनिवार्य ठरते.
नियम आणि दुर्दैवी ‘डेडलाईन’: २८ दिवसांचा तो घातक काळ
या अपघाताच्या मुळाशी एक तांत्रिक नियम आणि नियतीचा क्रूर खेळ असल्याचे स्पष्ट होत आहे. या विमानाची भारतात नोंदणी २ जून २०२१ रोजी झाली होती. केंद्र सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाच्या नियमानुसार, १ जुलै २०२१ नंतर नोंदणी होणाऱ्या प्रत्येक नवीन विमानाला ‘गगन’ यंत्रणा बसवणे बंधनकारक होते. दुर्दैवाने, अजित पवारांचे विमान या डेडलाईनच्या अवघ्या २८ दिवस आधी नोंदणीकृत झाले होते. तांत्रिकदृष्ट्या हे विमान सरकारी नियमात बसत असले, तरी सुरक्षेच्या आधुनिक निकषांनुसार ते ‘अपडेटेड’ नव्हते.
अपघाताच्या वेळी नेमकं काय घडलं असावं?
तज्ज्ञांच्या प्राथमिक अंदाजानुसार, बुधवारी सकाळी बारामती परिसरात दाट धुके असल्याने दृश्यमानता (Visibility) अत्यंत कमी होती. विमानात ‘गगन’ सारखी प्रगत यंत्रणा नसल्याने वैमानिकाला केवळ अंदाजावर आधारित म्हणजेच ‘स्टेप डाऊन अप्रोच’ पद्धतीने लँडिंग करावे लागले. पहिल्या प्रयत्नात यश न आल्याने दुसऱ्यांदा लँडिंगचा प्रयत्न करताना धावपट्टीचा अचूक अंदाज न आल्याने विमानाचे नियंत्रण सुटले आणि ते कोसळले असावे, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अपघातात सापडलेले हे ‘लिअरजेट’ विमान सुमारे १६ वर्षे जुने होते. आता नागरी उड्डाण महासंचालनालय (DGCA) या विमानातील जुन्या नेव्हिगेशन यंत्रणेची कसून चौकशी करत आहे. केवळ ‘जुन्या नोंदणी’चे कारण पुढे करून अशा महत्त्वाच्या सुरक्षा यंत्रणेकडे दुर्लक्ष करणे एका राज्याच्या नेत्याच्या जिवावर बेतले का? असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. तांत्रिक नियमांच्या पळवाटेमुळे एका मोठ्या नेतृत्वाचा बळी गेला का, याचे उत्तर आता सखोल तपासातूनच स्पष्ट होईल.


