Shashikant Shinde On NCP Merger: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते शशिकांत शिंदे यांनी आज या प्रकरणावर सविस्तर भाष्य करत अनेक धक्कादायक खुलासे केले. अजितदादा हयात असताना दोन्ही पक्ष एकत्र येण्यावर शिक्कामोर्तब झाले होते, अशी माहिती त्यांनी दिली.
नेतृत्वाचा पेच आणि ‘अजितदादां’ची भूमिका
दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र आल्यास नेतृत्व कोण करणार? या प्रश्नावर बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले, “आता परिस्थिती बदलली आहे. अजितदादा आपल्यात नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. विलीनीकरणाबाबत काही ठोस भूमिका ठरल्या होत्या. मात्र, दादांच्या जाण्यानंतर आता पुढे काय करायचे, यावर दोन्ही बाजूंच्या चर्चा होतील आणि मगच निर्णय घेतला जाईल. समोरचा गट कसा प्रतिसाद देतो, यावर सर्व काही अवलंबून आहे.”
हेही वाचा – 537 कोटींचा शंभूनगरीचा विकास आराखडा ही अजितदादांची दूरदृष्टी : केंदूरमध्ये मान्यवरांच्या भावना
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर प्रश्नचिन्ह?
महाराष्ट्र अजूनही अजित पवारांच्या निधनाच्या धक्क्यातून सावरलेला नसताना, सुनेत्रा पवार यांचा शपथविधी इतक्या घाईत का उरकला जात आहे, असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, “दादांचे जाणे राज्यासाठी मोठे दुःख आहे. अशा वातावरणात शपथविधीचा निर्णय का आणि कशासाठी घेतला, याचे उत्तर सुनेत्रा वहिनी, त्यांचे कुटुंबीय किंवा मुख्यमंत्रीच देऊ शकतील.”
१७ जानेवारीच्या ‘त्या’ बैठकीचे रहस्य
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या १७ जानेवारीच्या बैठकीचा संदर्भ देत शिंदे यांनी स्पष्ट केले की, ही बैठक जयंत पाटील यांच्याकडे नव्हे, तर शरद पवारांच्या निवासस्थानी झाली होती. ७ तारखेला निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दोन्ही पक्ष एकत्र येण्याचा निर्णय झाला होता. इतर नेत्यांच्या संमतीबाबत विचारले असता, “मी सर्वांशी चर्चा केली आहे, तुम्ही काळजी करू नका, निर्णय माझा आहे,” असे ठाम आश्वासन अजितदादांनी दिले होते, असंही शशिकांत शिंदे यांनी म्हटलं आहे.
इतर नेत्यांचा विरोध होता का?
अजितदादांच्या गटातील काही बड्या नेत्यांचा या विलीनीकरणाला विरोध होता का? यावर बोलताना शिंदे यांनी सावध प्रतिक्रिया दिली. “याबद्दल मला कल्पना नाही. आता सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर दोन्ही बाजूचे नेते एकत्र बसतील आणि चर्चा करतील. त्यानंतरच पुढची दिशा ठरवली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.


