Maharashtra Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठे चढउतार पाहायला मिळत असून, कधी थंडी तर कधी पावसाचा अनुभव नागरिक घेत आहेत. अशातच भारतीय हवामान विभागाने राज्यातील अनेक भागांसाठी थेट अवकाळी पावसाचा इशारा दिल्याने खळबळ उडाली आहे. जोरदार वारे, विजांचा कडकडाट आणि पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, तब्बल सात जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
फेब्रुवारी महिन्याची सुरुवात झाली असली तरी या महिन्यात विशेष थंडी जाणवणार नसल्याचे हवामान विभागाने आधीच स्पष्ट केले होते. मात्र, आता अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. काल राज्यातील अनेक भागात धूसर वातावरण निर्माण झाले होते, तर वायू प्रदूषणातही मोठी वाढ नोंदवण्यात आली. सतत बदलणाऱ्या हवामानामुळे सर्दी, खोकला, श्वसनाचे त्रास आणि श्वास घेण्यास अडचणी जाणवत असल्याचे चित्र आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, उत्तर महाराष्ट्रात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता असून नाशिक, धुळे आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाचा अंदाज आहे. याशिवाय छत्रपती संभाजीनगर, नंदूरबार, अहिल्यानगर आणि ठाणे जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. केरळच्या किनाऱ्यालगत सुमारे ९०० मीटर उंचीवर चक्राकार वारे सक्रिय असल्यामुळे राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. पुढील एक ते दोन दिवस राज्यात पावसाची शक्यता कायम आहे.
दरम्यान, अवकाळी पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यातच आता पुन्हा पावसाचा इशारा मिळाल्याने शेतीच्या नुकसानीची भीती वाढली आहे. डिसेंबरमध्ये थंडी कायम होती, मात्र जानेवारीच्या सुरुवातीपासूनच तापमानात मोठे बदल झाले. १ जानेवारीला झालेल्या मुसळधार पावसानंतर राज्यातील हवामान पूर्णपणे बदलले असून, नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.


