Online Fraud Compensation: डिजिटल व्यवहारांच्या युगात ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाण वाढत असताना भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) ग्राहकांसाठी एक मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी शुक्रवारी जाहीर केले की, ऑनलाइन फसवणुकीला बळी पडलेल्या ग्राहकांना आता 25 हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाईल. डिजिटल पेमेंट अधिक सुरक्षित करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलले जात असून, लवकरच या संदर्भात सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जाणार आहेत.
आरबीआयने या मदतीसाठी एक निश्चित मर्यादा (Capping) लावली आहे. नवीन नियमांनुसार, ग्राहकाला मिळणारी भरपाई ही त्याच्या झालेल्या नुकसानीच्या ८५ टक्के किंवा २५,००० रुपये, यापैकी जी रक्कम कमी असेल ती दिली जाईल. जर तुमची ५०,००० किंवा १ लाख रुपयांची फसवणूक झाली, तरी तुम्हाला कमाल २५,००० रुपयेच मिळतील. मात्र, जर तुमचे नुकसान २०,००० रुपये झाले असेल, तर त्याच्या ८५ टक्के म्हणजेच १७,००० रुपये तुम्हाला परत मिळू शकतात.
‘एकदाच’ मिळणार संधी; जबाबदारीचेही होणार परीक्षण
महत्त्वाची बाब म्हणजे, ही भरपाई दरवर्षी किंवा प्रत्येक फसवणुकीवर मिळणार नाही. ग्राहकांनी स्वतः सतर्क राहावे आणि वारंवार चुका करू नयेत, यासाठी ही मदत आयुष्यात केवळ एकदाच दिली जाईल. तसेच, या प्रक्रियेत फसवणूक नेमकी कशी झाली आणि त्यात ग्राहकाची काही चूक होती का, याचेही परीक्षण केले जाणार आहे. २०१७ च्या जुन्या नियमाचा आढावा घेऊन आरबीआय आता ग्राहकांची जबाबदारी नव्याने निश्चित करणार आहे.
फसवणुकीच्या आकडेवारीने वाढवली चिंता
रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, २०२४-२५ या आर्थिक वर्षात कार्ड आणि इंटरनेट फसवणुकीची तब्बल १३,४६९ प्रकरणे नोंदवली गेली असून, यात ५.२ अब्ज रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याआधीच्या वर्षी हा आकडा १४.५७ अब्ज रुपयांच्या घरात होता. फसवणुकीचे हे मोठे प्रमाण पाहता, ग्राहकांना संरक्षण देणे आवश्यक असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. या सुधारित नियमांबाबत लवकरच जनतेचा अभिप्राय घेतला जाणार आहे.


