अष्टपैलू
ट्वेन्टी-२० क्रिकेट हे क्रिकेटच्या अन्य प्रकारातील सर्वात लघुत्तम स्वरुपाचे असले तरी ते अधिक वेगवान आणि आक्रमक आहे. या क्रिकेटमध्ये एकेका षटकाला, एकेका चेंडूला अधिक महत्व आहे. एका षटकाचे महत्व काय याचा प्रत्यय सध्या सुरु असलेल्या टी २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी समोर आले. न्यूझीलंड, इंग्लंड आणि श्रीलंका या सातत्याने क्रिकेट खेळणाऱ्या संघांच्या विजयात एक षटक निर्णायक ठरले.
चेन्नईत न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान संघात झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने आरामात विजय मिळविलेला दिसत असला, तरी त्यांच्या विजयात अफगाणिस्तानचा अनुभवी फिरकी गोलंदाज रशिद खानचे पहिलेच षटक निर्णायक ठरले. अफगाणिस्तान संघाने गलबदिन नईबच्या अर्धशतकी खेळीने आव्हानात्मक मजल मारली होती. फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर अफगाणिस्तानच्या मुजीब उर रहमान आणि रशिद खान यांनी आव्हान उभे करण्याचा जरुर प्रयत्न केला. मात्र, रशिद खानच्या पहिल्याच षटकांत चौदा धावा कुटल्यानंतर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी मागे वळून बघितले नाही. तेथून त्यांनी आवश्यक धावांचे गणित अगदी सहज पार केले. टिम सैफर्ट, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिचेल आणि कर्णधार मिशेल सॅंटनर यांनी विजयाचा मार्ग सुरेख पार केला. वेगवान क्रिकेटच्या या युगात टिम सैफर्ट, फिन अॅलन, ग्लेन फिलिप्स हे न्यूझीलंडचे गुणी खेळाडू आहेत. त्यांना आता डॅरिल मिचेल आणि मार्क चॅपमन यांची सुरेख साथ मिळत आहे. स्पर्धेतील हा सर्वात कठिण गट असल्यामुळे आता न्यूझीलंडच्या या खेळाडूंना सातत्य दाखवावे लागणार आहे,तर अफगाणिस्तानला आपल्या नियोजनात सुधारणा करुन खेळ उंचवावा लागणार आहे. कारण, आता दोघांसमोरही दक्षिण आफ्रिकेचे तगडे आव्हान राहणार आहे.
मुंबईत इंग्लंड आणि नेपाळ या संघात झालेल्या सामन्यातही दोन्ही डावातील अखेरचे एक षटक निर्णायक ठरले. विशेष म्हणजे दोन्ही वेळेस याचा फायदा इंग्लंडलाच झाला. जेकब बेथल आणि हॅरी ब्रूक यांच्या अर्धशतकी खेळीनंतरही इंग्लंडचा डाव कुठेतरी रेंगाळला होता. डावाच्या १९व्या षटकांत ६ बाद १६३ अशी त्यांची स्थिती होती. तेव्हा अखेरच्या १९व्या षटकात विल जॅक्सने तीन षटकारांसह कुटलेल्या २१ धावा पुढे जाऊन त्यांच्यासाठी निर्णायक ठरल्या. दीपेंद्र सिंह ऐरी आणि लेकेश बाम यांच्या जिगरबाज खेळीने नेपाळने या आव्हानाचाही पाठलाग एकवेळ सुकर केला होता. एक षटकत शिल्लक असताना नेपाळ ६ बाद १७५ अशा स्थितीत होते. अखेरच्या षटकांत विजयासाठी त्यांना केवळ दहा धावांची गरज होती. या वेळी सॅम करनने टाकलेले षटक विलक्षण ठरले. या वेळी करनच्या भेदक यॉर्करने नेपाळच्या फलंदाजांना जेरीस आणले आणि त्यांना केवळ पाच धावा करता आल्या. या वेळी करनचा अनुभव देखिल कामी आला. अननुभवी नेपाळ संघ हरला असला, तरी ते या लढतीतून जरुर बोध घेतील.
घरच्या मैदानावर श्रीलंका संघाला आयर्लंडविरुद्ध विजय मिळविताना अनपेक्षितपणे संघर्ष करावा लागला. आयर्लंडच्या फिरकी गोलंदाजांसमोर श्रीलंकेचा डाव अडखळला होता. मात्र, कुशल मेंडीस आणि कामिंडू मेंडस यांनी श्रीलंका संघाची नौका तीरावर आणताना १६३ धावांचे किमान आव्हान उभे केले. त्यानंतर फिरकी गोलंदाज महेश तिक्ष्णनाने नव्या चेंडूवर केलेला अप्रतिम मारा आणि जायबंदी असतानाही वानिंदू हसरंगाने आपल्या फिरकीची दाखवलेली कमाल श्रीलंकेसाठी महत्वाची ठरली. श्रीलंकेच्या फिरकीसमोर आय़र्लंडच्या फलंदाजीला खीळ बसली, डावाच्या सतराव्या षटकातील तिसऱ्या चेंडूपर्यंत आयर्लंडची अवस्था ४ बाद १२० अशी होती. पण, त्या षटकांत लागोपाठच्या चेंडूवर त्यांनी दोन फलंदाज गमावले. तेथून त्यांच्या आव्हानातील जणू हवाच गेली. कारण, त्या स्थितीत आयर्लंडने २० चेंडूत उर्वरित सहा फलंदाज २३ धावांत गमावले.
स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी एक षटक निर्णायक ठरले असले, तरी सातत्याने खेळणाऱ्या संघांसमोर अननुभवी संघ नेटाने उभे राहिले हे विसरता येणार नाही. टी २० क्रिकेटच्या वाढत्या लोकप्रियतेचे हे लक्षण आहे. अफगाणिस्तानला अननुभवी म्हणता येणार नाही. त्यांनी आतापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली योग्यता नेहमीच सिद्ध केली आहे. मात्र, संघातील नवोदित खेळाडू अजून आंतरराष्ट्रीय स्तरावर रुळलेले नाहीत. तसेच संघाची धुरा सातत्याने बदलण्याचे त्यांचे धोरण काही अंशी त्यांना मारक ठरत आहे. आयर्लंडही अजून आंतरराष्ट्रीय स्तरावर फारसे चमकलेले नाहीत. आयर्लंडच काय पण, अन्य सहयोगी सदस्यांना फारसे क्रिकेट खेळायला मिळत नाही. हेच त्यांच्या अपयशाचे कारण असू शकते. अर्थात, फ्रॅंचाईजी क्रिकेटच्या युगात भविष्यात त्यांचे खेळाडू देखिल ओढले जातील यात शंका नाही.
जाता जाता कालच्या स्तंभातील अखेरच्या पाकिस्तान, आयसीसी चर्चेची आठवण आजही करुन देतो. कारण, आयसीसीने आता पाकिस्तानच्या भारताविरुद्ध न खेळण्याच्या निर्णयाचा तिढा सोडविण्यासाठी इम्रान ख्वाजा यांची मध्यस्थ म्हणून नियुक्ती केली आणि ते पाकिस्तानशी चर्चा करण्यासाठी पाकिस्तानात दाखल झाले आहेत. लाहोरच्या कर्नल गदाफी मैदानावर ही भेट झाली असून, यातून सारे काही पूर्वीसारखेच जुळून येईल असेच चित्र दिसत आहे.


