Pune Student Suicide: पुण्यातील दिघी परिसरातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली असून, 19 वर्षीय विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे. अथर्व विजय देशमुख असे या मृत विद्यार्थ्याचे नाव असून, तो वाघोली येथील एका नामांकित महाविद्यालयात ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (AI) या विषयात पदवीचे शिक्षण घेत होता. रविवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, तरुण विद्यार्थ्याने उचललेल्या या टोकाच्या पावलामुळे सर्वजण सुन्न झाले आहेत.
आई घराबाहेर असताना उचलले टोकाचे पाऊल
मिळालेल्या माहितीनुसार, अथर्व आपल्या आईसोबत दिघीतील गंगोत्री रुग्णालयाजवळ एका भाड्याच्या खोलीत राहत होता. रविवारी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास त्याची आई कामानिमित्त घराबाहेर गेली असताना ही घटना घडली. अथर्वने स्वयंपाकघरात सीटबेल्टचा वापर करून गळफास लावून घेतला. त्याची आई घरी परतल्यानंतर दरवाजा आतून बंद असल्याचे आढळले. हाका मारूनही प्रतिसाद न मिळाल्याने शेजाऱ्यांच्या मदतीने खिडकीवाटे आत प्रवेश केला असता, अथर्व गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. मुलाला या स्थितीत पाहून त्याच्या आईला मोठा मानसिक धक्का बसला आहे.
मोबाईल डेटा नष्ट केल्याने गुढ वाढले
दिघी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असता, एक अत्यंत संशयास्पद आणि महत्त्वाची बाब समोर आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी अथर्वने आपला मोबाईल फोन पूर्णपणे ‘फॉर्मेट’ करून त्यातील सर्व डेटा नष्ट केला होता. त्याने हे पाऊल नेमके का उचलले आणि मोबाईलमधील माहिती का पुसून टाकली, याबाबत आता अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. पोलिसांनी त्याचा मोबाईल जप्त केला असून, तांत्रिक तज्ज्ञांच्या मदतीने त्यातील माहिती पुन्हा मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
घटनेनंतर अथर्वला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अभ्यासात हुशार असलेल्या आणि भविष्यातील महत्त्वाच्या अशा AI तंत्रज्ञानाचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाने असे पाऊल का उचलले, याचे गुढ अद्याप कायम आहे. दिघी पोलीस सध्या देशमुख कुटुंबातील सदस्य, त्याचे मित्र आणि महाविद्यालयीन सहकाऱ्यांकडे चौकशी करत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे देशमुख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


