ठाणे : इराण- इस्रायल यल देशातील संघर्षामुळे मागील काही दिवसांपासून व्यवसायिक गॅस सिलिंडर वेळेत उपलब्ध होत नसल्याने ठाणे शहरातील जवळपास २० टक्के हाॅटेल बंद झाली आहेत. जे हाॅटेल सुरु आहेत, ते फक्त हाॅटेलमधील कामगार नोकरी सोडून जाऊ नये यासाठी सुरु आहेत. कारण यातील बहुतांश कामगार परराज्यातील आहेत. हाॅटेल बंदचा परिणाम आयटी क्षेत्र किंवा इतर क्षेत्रात काम करणाऱ्या नोकरदारांनाही सहन करावा लागत आहे.
इराण-इस्रायल संघर्षामुळे मागील काही दिवसांपासून गॅस सिलिंड मिळणे कठीण झाले आहेत. व्यवसायिक सिलिंडर हाॅटेलसाठी उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे मागील दोन आठवड्यांपासून ठाणे शहरातील विविध हाॅटेलला टाळे लागत आहे. ठाणे शहरात सुमारे ८०० हाॅटेल आहेत. या हाॅटेलमध्ये बहुतांश कामगार हे ओडिशा, बिहार, उत्तरप्रदेश राज्यातील आहेत. यातील ६० टक्के कामगार एकट्या ओडिशा राज्यातील असून ते जेवण बनविण्याचे मुख्य काम करतात. या कामगारांची राहण्याची व्यवस्था देखील हाॅटेलमध्येच किंवा आसपासच्या परिसरात केली जाते.
मागील काही दिवसांपासून इराण-इस्त्रायल संघर्षाच्या परिणाम झाल्याने या कामगारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे कामगार पुन्हा एकदा गावी जाऊन शेती करण्याच्या बेतात आहेत. तर हाॅटेल मालक त्यांना थांबविण्याचा प्रयत्न करत आहेत. हाॅटेल हा नेहमी मिळणाऱ्या पदार्थांसाठी आणि चवीसाठी प्रसिद्ध असतो. कामगार सोडून गेले तर नव्याने कामगार शोधणे, अन्नपदार्थ बनविल्यास ते अन्नपदार्थ चवीचे होतील का असे वेगवेगळे प्रश्न भेडसाविण्याची शक्यता असल्याने काही हाॅटेल मालकांनी हाॅटेलमधील जेवणाचे उपलब्ध पदार्थ कमी करुन हाॅटेल सुरु ठेवले. जेणेकरून कामगार सोडून जाणार नाही. तर काही हाॅटेल मालकांनी इलेक्ट्रिक शेगडीचा पर्याय निवडला. परंतु तो किती दिवस चालेल हा प्रश्न हाॅटेल मालकांना आहे.


