Ashok Kharat Case: काळी जादू, अघोरी कृत्ये आणि फसवणुकीच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणावरून महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी या वादात उडी घेत भारतीय जनता पक्षावर घणाघाती टीका केली आहे. अशोक खरात हा भाजपचाच अधिकृत प्रचारक आहे, असा खळबळजनक दावा करत राऊतांनी केला आहे.
इंटेलिजन्स फक्त विरोधकांसाठीच का?
राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना राऊत म्हणाले की, राज्याचे गुप्तचर खाते केवळ विरोधकांवर पाळत ठेवण्यासाठीच वापरले जात आहे का? जर अघोरी कृत्ये आणि समाजविघातक प्रकार सुरू होते, तर गृहखात्याला याची भणक कशी लागली नाही? पोलीस एखाद्या महिलेच्या तक्रारीची वाट का पाहत बसले होते? असा बोचरा सवाल त्यांनी विचारला.
मंत्रिमंडळातील सहभागाचा गंभीर आरोप
राऊत यांनी केवळ भाजपवरच नव्हे, तर राज्य सरकारमधील मंत्री आणि आमदारांवरही गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, अशोक खरातच्या या अघोरी दरबारामध्ये मंत्रिमंडळातील काही सदस्य, आमदार आणि खासदार सहभागी असल्याचा दावा राऊतांनी केला आहे. जर मुख्यमंत्र्यांना या प्रकारांची पूर्वकल्पना होती, तर त्यांनी तातडीने धाडी टाकून हे प्रकार का थांबवले नाहीत? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. वेळेत कारवाई झाली असती, तर अनेकांची प्रतिष्ठा वाचली असती, असेही ते म्हणाले.
‘माहिती होती तर कारवाई का केली नाही?’
दरम्यान, विधानसभेत सरकारने दिलेल्या माहितीचा संदर्भ देत राऊत पुढे म्हणाले, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणतात की त्यांना या प्रकारांची माहिती होती. मग ही कृत्ये रोखण्यासाठी मुहूर्त कशाचा पाहिला जात होता? राज्याच्या प्रमुखांनी अशा विकृत प्रकारांकडे दुर्लक्ष करणे हे अत्यंत दुर्दैवी आहे.


