Asha Mirge On Rupali Chakankar: नाशिकचा स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरात याच्या अघोरी कृत्यांचा पर्दाफाश झाल्यानंतर आता राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक आरोप समोर आला आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या आशा मिरगे यांनी माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर ताशेरे ओढले आहेत. “चाकणकर या स्वतः अनेक निष्पाप महिलांना जाणीवपूर्वक अशोक खरातच्या जाळ्यात ओढायच्या,” असा खळबळजनक दावा मिरगे यांनी केला आहे. या आरोपामुळे महिला आयोगाच्या विश्वासार्हतेवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.
‘हा माझा पांडुरंग’ म्हणत महिलांचा विश्वास संपादन?
‘एबीपी माझा’शी बोलताना आशा मिरगे यांनी चाकणकर यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र टीका केली. त्यांच्या मते, महिला संघटनांच्या बैठकीत रुपाली चाकणकर या अशोक खरातचा उल्लेख ‘माझा पांडुरंग’ असा करायच्या. “मी आज जे काही आहे, ते केवळ यांच्यामुळेच आहे,” असे सांगून त्या भोळ्याभाबड्या महिलांचा विश्वास जिंकायच्या आणि त्यांना खरातच्या संपर्कात आणायच्या, असा आरोप मिरगे यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर, खरातचे संबंध केवळ राजकीय नेत्यांशीच नसून अनेक आयएएस (IAS) आणि आयपीएस (IPS) अधिकारी त्याचे ‘बिझनेस पार्टनर’ असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
ग्लॅमर आणि मेक-अपमुळे पीडित महिला दुरावल्या
महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर असताना चाकणकर यांचा वावर हा एखाद्या सेलिब्रिटीसारखा ग्लॅमरस होता, अशी टीकाही मिरगे यांनी केली. “त्यांचा ड्रेसिंग सेन्स, सततचा मेक-अप आणि मंत्र्यांसोबतची उठबस यामुळे पीडित महिलांना त्या कधीच आपल्या वाटल्या नाहीत. आयोगाचा जो संवेदनशील चेहरा असायला हवा होता, तो हरवला होता,” असे मिरगे यांनी नमूद केले. या ग्लॅमरस राहणीमानामुळे ग्रामीण भागातील पीडित महिलांना त्यांच्यासमोर आपली व्यथा मांडताना संकोच वाटत असे, असेही त्यांनी पुढे म्हटले.
५८ अश्लील व्हिडिओ आणि ‘विकृती’चा कॅमेऱ्यात खुलासा
अशोक खरातचे वासनांध साम्राज्य नेमके कसे उघड झाले, याचा थरारक घटनाक्रम मिरगे यांनी सांगितला आहे. खरातचा कर्मचारी नीरज जाधव याला संशय आल्यावर त्याने कार्यालयात छुपे कॅमेरे लावले होते. एका आरटीओ महिला अधिकाऱ्याला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार करतानाचे दृश्य या कॅमेऱ्यात कैद झाले. जेव्हा नीरजने या व्हिडिओच्या आधारे पैशांची मागणी केली, तेव्हा हे प्रकरण शिर्डी पोलिसांपर्यंत पोहोचले. तपासादरम्यान पोलिसांना नीरजच्या मोबाईलमध्ये तब्बल 58 आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले आहेत, ज्यात अनेक बड्या महिलांची नावे असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कुंपणानेच शेत लांडग्यांच्या पुढ्यात टाकले
आशा मिरगे यांनी अत्यंत कडक शब्दांत संताप व्यक्त करताना म्हटले की, “आम्ही ऐकले होते की कुंपणच शेत खाते, पण इथे तर कुंपणानेच अख्खे शेत लांडग्यांच्या पुढ्यात टाकले आहे.” महिलांचे रक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती, त्यांनीच त्यांना भोंदूबाबाच्या स्वाधीन केले, असा त्यांच्या आरोपाचा थेट रोख आहे. या प्रकरणामुळे आता महिला सुरक्षा आणि राजकीय नेत्यांचे भोंदूबाबांशी असलेले हितसंबंध यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.


