Dombivli: डोंबिवलीतील हॉटेलच्या किचनमध्ये सध्या युद्धाचा मोठा तडाखा बसला असून परिस्थिती बिकट होत आहे. अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचे पडसाद आता थेट सामान्य माणसाच्या ताटापर्यंत आणि हॉटेल व्यावसायिकांच्या चुलीपर्यंत पोहोचले आहेत.
या जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅसचा पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला असून डोंबिवलीतील नामांकित हॉटेल व्यावसायिकांवर आता चक्क टाळे लावण्याची वेळ आली आहे. ज्या ठिकाणी अत्याधुनिक हाय टेक गॅस यंत्रणा होती, तिथे आता नाईलाजास्तव चक्क पार्किंगमध्ये चुली पेटवून स्वयंपाक करावा लागत असल्याचे धक्कादायक चित्र पाहायला मिळत आहे.
प्रसिद्ध हॉटेललाही फटका
युद्धाचा हा धूर आता सीमा ओलांडून डोंबिवलीतील सोनाली सारख्या प्रसिद्ध रेस्टॉरंट्सच्या थेट किचनमध्ये शिरला आहे. इंधन तुटवड्यामुळे व्यावसायिक गॅस सिलेंडर्सचा पुरवठा जवळपास ठप्प झाला असून हॉटेलच्या पार्किंगमध्ये रिकाम्या सिलेंडर्सच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
मात्र या सिलेंडर्समध्ये गॅस नसल्याने हॉटेल मालकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. अखेर व्यवसायाचा गाडा ओढण्यासाठी हॉटेल मालकांनी पार्किंगच्या मोकळ्या जागेत दगड मांडून चुली पेटवल्या आहेत. यामुळे हॉटेलचा डामडौल बाजूला राहून आता पारंपरिक चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे.
धुराच्या लोटात हाल
या बदललेल्या परिस्थितीचा सर्वाधिक फटका हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना बसत आहे. जे शेफ एखाद्या स्टार हॉटेलच्या वातानुकूलित किचनमध्ये बसून चविष्ट डिशेस बनवायचे, त्यांना आता पार्किंगमध्ये धुराच्या लोटात बसून चुलीवर मटण भाकरी बनवण्याचे काम करावे लागत आहे. केवळ स्वयंपाक करणे एवढ्यावरच हे थांबत नाही, तर वखारीतून महागडी लाकडे विकत आणणे, ती कुऱ्हाडीने तोडणे आणि पेटवणे यातच कर्मचाऱ्यांचा निम्मा वेळ आणि शक्ती खर्च होत आहे. या सततच्या धुरामुळे अनेक कर्मचारी आजारी पडत असून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
हॉटेलला लागणार टाळे?
हॉटेल मालक अनिल राऊत यांनी आपली हतबलता व्यक्त करताना सांगितले की, गॅस नसल्याने नाईलाजास्तव चुलीचा आधार घ्यावा लागला आहे. मात्र पार्किंगमध्ये पेटवलेल्या या चुलींच्या धुरामुळे केवळ कर्मचारीच नाही तर ग्राहकही आता पाठ फिरवू लागले आहेत. धुराचा त्रास होत असल्याने ग्राहक हॉटेलमध्ये येण्यास कचरत आहेत.
एकीकडे कर्मचाऱ्यांचे आजारपण आणि दुसरीकडे घटलेली ग्राहकांची संख्या यामुळे हॉटेल चालवणे आता अशक्य होत चालले आहे.हीच परिस्थिती कायम राहिली, तर अनेक हॉटेल्सना कायमचे कुलूप लावावे लागेल अशी भीती आता व्यक्त केली जात आहे.


