Maharashtra weather : राज्यात उष्णतेचा चटका कायम असतानाच अवकाळी पावसानेही जोर धरला असून हवामानात मोठे चढउतार दिसत आहेत. हवामान विभागाकडून पुढील ३ तास महत्त्वाचे असल्याचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असून काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे या भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
बुधवारी दुपारनंतर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत पावसाच्या सरी कोसळल्या. पुणे आणि सतारा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला, तर काही भागांत गारपिटीची नोंद झाली.
दरम्यान, उष्णतेची तीव्रता अजूनही कायम आहे. वर्धा येथे ४४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अकोला, गडचिरोली, अमरावती, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांत तापमान ४३ अंशांपेक्षा जास्त राहिले, तर नागपूर, जळगाव, भंडारा आणि वाशीममध्येही तापमान ४२ अंशांच्या पुढे गेले.
आज मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांत उष्ण व दमट हवामान राहणार आहे. दुसरीकडे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, सोलापूर, बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पुणे घाटमाथा, सातारा, सांगली आणि कोल्हापूर भागात गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
बदलत्या हवामानामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, दुपारच्या वेळेत अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, तसेच शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


